लोकसत्ता प्रतिनिधी

नाशिक : लोकसभा निवडणूक शांततेत पार पडावी, यासाठी प्रशासन वर्षभरापासून काम करीत होते. परंतु, मतदान प्रक्रिया सुरू होण्यापूर्वीच जिल्ह्यातील काही गावांनी पाण्यासह मूलभूत सोयी सुविधा मिळत नसल्याच्या निषेधार्थ मतदान प्रक्रियेवर बहिष्कार टाकला. काही ठिकाणी प्रशासनाकडून युध्द पातळीवर प्रयत्न करत प्रश्न मार्गी लावण्यात आले. परंतु, काही ठिकाणी गावांचा बहिष्कार कायम राहिला.

दुष्काळात मालमत्तेसह पीक नुकसानीची भरपाई न मिळाल्याने तसेच पाणीटंचाई समस्येवर प्रशासनाने उपाययोजना न केल्याच्या निषेधार्थ मालेगाव तालुक्यातील मेहुणे गावकऱ्यांनी सोमवारी मतदानावर बहिष्कार टाकला. गावकरी आपल्या भूमिकेवर ठाम राहिल्याने दुपारी साडेतीनपर्यंत हा तिढा सुटू शकला नव्हता.

आणखी वाचा-नाशिकमध्ये मतदान केंद्राबाहेर जय श्रीराम, अबकी बार ४०० पारच्या घोषणा

दिंडोरी लोकसभा मतदार संघात समाविष्ट असलेल्या मेहुणे गावात यंदाच्या उन्हाळ्यात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. तसेच पावसाअभावी निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीत यंदा खरीप हंगाम वाया गेला. शासनाकडून नुकसान भरपाई मिळालेली नाही. त्यामुळे गावकऱ्यांनी नाराजी व्यक्त करत शासनाकडून नुकसान भरपाई न मिळाल्यास आणि पिण्याचा पाणीप्रश्न न सोडविल्यास येणाऱ्या सर्व निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा एकमुखी ठराव मेहुणे ग्रामसभेने काही दिवसांपूर्वी केला होता. त्यानुसार लोकसभा निवडणुकीच्या मतदानावर गावकऱ्यांनी बहिष्कार टाकला. एकाही मतदाराने या ठिकाणी मतदानाचा हक्क बजावला नाही. उमेदवारांचे प्रतिनिधीही मतदान केंद्राकडे फिरकले नाहीत.

मेहुणे गावाने बहिष्कार टाकल्याचे समजल्यावर अधिकाऱ्यांची एकच धावपळ उडाली. मालेगावचे अप्पर जिल्हाधिकारी देवदत्त केकाण, तहसीलदार नितीनकुमार देवरे, गटविकास अधिकारी अजितसिंग पवार आदी अधिकाऱ्यांनी गावाला भेट देऊन बहिष्कार मागे घेण्याची विनंती गावकऱ्यांना केली. परंतु, जोपर्यंत दुष्काळाची नुकसान भरपाई मिळत नाही आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था होत नाही, तोपर्यंत बहिष्कार मागे घेणार नाही, अशी ताठर भूमिका गावकऱ्यांनी घेतली. तसेच झाडी चणकापूर धरणातून पाणीपुरवठ्याची योजना सुरू करावी,अशी नवी मागणी गावकऱ्यांनी लावून धरली. त्यामुळे अधिकाऱ्यांना रिक्त हस्ते माघारी फिरावे लागले.

आणखी वाचा-नीट बोल…तुझी जहागीर आहे काय ? नाशिकमध्ये भाजप आमदार कोणावर भडकल्या ?

दुसरीकडे, त्र्यंबक तालुक्यातील झरवडजवळील जोशी कंपनी या आदिवासी वाडीपासून मतदान केंद्रावर जाण्यासाठी तीन किलोमीटर अंतर पायी चालावे लागणार असल्याने उन्हाचा तडाखा पाहता वस्तीतील ग्रामस्थांनी मतदान केंद्रापर्यंत जाण्यास नकार दिला. दुपारी तीन पर्यंत हे मतदार घरीच बसून होते. वेगवेगळ्या समस्यांमुळे मालेगाव तालुक्यातील मेहुणे तसेच त्र्यंबक तालुक्यातील झरवडजवळील जोशी कंपनी या आदिवासी वाड्याने मतदानावर बहिष्कार टाकला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ग्रामस्थांचा संताप

कित्ये दिवसांच्या मागणीकडे प्रशासनाकडून होणाऱ्या दुर्लक्षाच्या निषेधार्थ अखेर मतदानावर बहिष्काराचे अस्त्र मालेगाव तालुक्यातील मेहुणे तसेच त्र्यंबक तालुक्यातील झरवडजवळील जोशी कंपनी या आदिवासी वाडीला बाहेर काढावे लागले. या गावांच्या मागण्या तशा साध्याच. परंतु, वेगवेगळ्या कारणांमुळे या समस्या सोडविल्या गेल्या नाहीत. नुकसान भरपाई मिळावी, यासाठी मेहुणे ग्रामस्थ लढा देत आहेत. मागणी मान्य न झाल्यास मतदानावर बहिष्काराचा इशारा ग्रामस्थांनी आधीच दिला होता. दुसरीकडे, मतदान केंद्रावर जाण्यासाठी तीन किलोमीटर अंतर पायी चालावे लागणार असल्याने ग्रामस्थांनी मतदानच केले नाही.