लोकसत्ता प्रतिनिधी

जळगाव: भारत राष्ट्र समिती (बीआरएस) पक्ष हा महाराष्ट्रात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांसह लोकसभा, विधानसभा निवडणुका स्वबळावर लढविणार आहे. सध्या महाराष्ट्रात घडत असलेल्या राजकीय घडामोडी भारत राष्ट्र समिती पक्षाला पोषक आहेत, असे भारत राष्ट्र समितीचे राज्याचे समन्वयक तथा माजी आमदार शंकरराव धोंडगे यांनी सांगितले.

धोंडगे यांनी येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. महाराष्ट्रात पक्षाचा पाया भरला गेला आहे. प्रस्थापित राजकीय पक्षांतील माजी आमदारांसह विविध नेत्यांनी संपर्क केला आहे. त्याबाबतची यादी मोठी आहे. महाराष्ट्रातील गावागावांत आतापर्यंत १९ लाख पदाधिकारी नियुक्त झाले आहेत. महिनाभरात एका पक्षाला २८८ मतदारसंघांत समन्वयक भेटणे, ही आश्चर्याची बाब आहे. पक्षाला महाराष्ट्रातील ग्रामीण भागात मोठा प्रतिसाद मिळत आहे. आता महाराष्ट्रातील जनतेचाही कल बदलतोय. आता आपले अस्तित्व संपणार आहे, हे लक्षात आल्यानंतर या प्रस्थापित पक्षांच्या नेत्यांकडून आरोप केले जात आहेत. सध्या प्रस्थापित पक्षांना जनता कंटाळली आहे. सोलापूर, विदर्भासह मुंबई, पुणे तसेच महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांत के. चंद्रशेखर राव यांच्या सभा होणार असल्याचे धोंडगे यांनी सांगितले.

आणखी वाचा-शरद पवार यांचा दोन दिवस जळगाव दौरा; मुक्ताईनगर, पारोळा, धरणगावात जाहीर सभा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जळगाव जिल्ह्यात २५ हजारांवर पदाधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. तेलंगणातील विकासाचे प्रारुप महाराष्ट्रात जसेच्या तसे लागू झाले पाहिजे, असे आमचे धोरण असल्याचेही धोंडगे यांनी सांगितले.