नाशिक - कमालीची दूरदृष्टी आणि आधुनिक दूरशिक्षण प्रवाहाचे जनक असलेले यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे संस्थापक कुलगुरू प्रा. राम ताकवले यांच्या निधनाने महान द्रष्ट्याला आपण मुकलो आहोत. शिक्षण हाच समाज सुधारणेचा प्रारंभबिंदू आहे आणि ते घराघरापर्यंत पोहोचले पाहिजे, या तत्वाने आयुष्य वेचलेल्या प्रा. ताकवले यांच्या विचारांचा वारसा जपणे आणि तो पुढे नेणे हीच त्यांना खऱ्या अर्थाने श्रद्धांजली ठरेल, अशा आश्वासक शब्दांमध्ये प्रा. ताकवले यांना आदरांजली वाहण्यात आली. मुक्त विद्यापीठातर्फे कुसुमाग्रज स्मारकातील विशाखा सभागृहात प्रा. ताकवले यांच्या आठवणींना उजाळा देणारी श्रध्दांजली सभा आयोजित करण्यात आली. अध्यक्षस्थानी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे प्रथम कुलगुरू डॉ. एन. के. ठाकरे होते. कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे, ज्येष्ठ नेते माजी आमदार हेमंत टकले, मविप्र संस्थेचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे, विद्यापीठाचे कुलसचिव भटूप्रसाद पाटील उपस्थित होते. हेही वाचा >>>नाशिक: बुडाल्याने वेगवेगळ्या ठिकाणी चार जणांचा मृत्यू यावेळी प्रा. ताकवले यांच्या विविध आठवणी जागवणारी मनोगते व्यक्त झाली. हेमंत टकले यांनी सध्याच्या शिक्षणाच्या विद्रुपीकरणाच्या काळात ताकवले यांच्या विचारांचा वारसा जपणे काळाची गरज असल्याचे नमूद केले. ॲड. नितीन ठाकरे यांनी मविप्र शिक्षण संस्थेच्या ग्रामीण भागातील शिक्षण चळवळीला बळ, मार्गदर्शन आणि दिशा देण्यासाठी प्रा. ताकवले यांचे नेहमी मार्गदर्शन मिळाल्याचे सांगितले. कुलगुरू प्रा. सोनवणे यांनी शिक्षणाला तंत्रज्ञानाची जोड देण्यावर प्रा. ताकवले यांचा कायम भर असायचा. त्यांच्या तत्वाचे प्रत्यक्ष आचरण करण्यासाठी सामुहिक प्रयत्नांची गरज आहे. भविष्यातील बदलांचा अचूक वेध घेण्याची प्रचंड क्षमता असलेला द्रष्टा त्यांच्या ठायी होता. शिक्षकतज्ज्ञ जे. पी नायक यांनी समाज आज विज्ञान तंत्रज्ञानाच्या लाटेवर आरूढ आहे, त्यामुळे शिक्षणही त्याच लाटेच्या सहाय्याने पुढे नेले पाहिजे, हे प्रा. ताकवले यांचे तत्व होते, याकडे लक्ष वेधले. हेही वाचा >>>लासलगाव बाजार समितीत दोनही गट एकत्र; सभापतिपदी बाळासाहेब क्षीरसागर, उपसभापतिपदी गणेश डोमाडे डॉ. एन. के.ठाकरे यांनी ताकवले हे माणूस म्हणून विलोभनीय होते. त्यांनी मुक्त शिक्षणाची ज्ञानगंगा घरोघरी नेण्याचा ध्यास घेतला होता. आज विज्ञानाने, तंत्रज्ञानाने सर्व जग जवळ आणले आहे. परंतु मानवाने आपल्या शेजाऱ्यालाही ओळख देऊ नये, अशी संस्कृती निर्माण करीत दरी वाढवत नेली. एखादा देश कुठल्या स्मृती जागवतो आणि कुठल्या स्मृतींना काळोखात ढकलतो, यावर त्या देशाची संस्कृती ठरते. आपण ताकवले यांच्यासारख्या थोर शिक्षणतज्ञाच्या स्मृतींचा जागर करतोय, ही आश्वासक बाब असल्याचे ते म्हणाले. व्यवस्थापन मंडळाचे सदस्य डॉ. जयदीप निकम, मुक्त विद्यापीठाचे माजी संचालक तथा ज्येष्ठ समीक्षक डॉ. रमेश वरखेडे, विलास शिंदे, शिक्षणशास्त्र विद्याशाखेच्या संचालक डॉ. कविता साळुंके, रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष ॲड. भगीरथ शिंदे यांनीही मनोगत व्यक्त केले.