जळगाव : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामध्ये काम करण्याची धमक असून, प्रशासनावरही त्यांची मजबूत पकड आहे. अशा माणसाच्या हातात नेतृत्व दिल्यावर राज्याची प्रगती झाल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे एक ना एक दिवस अजितदादा राज्याचे मुख्यमंत्री निश्चितपणे होणार, असा दावा सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी केला आहे.
जळगाव जिल्ह्यातील अमळनेरमधील विविध विकास कामांच्या पायाभरणीसह लोकार्पण आणि एका सहकारी बँकेच्या शतक महोत्सवी कार्यक्रमासाठी मंत्री बाबासाहेब पाटील गुरूवारी उपस्थित होते. याप्रसंगी मनोगतात त्यांनी अजित पवार यांच्यावर स्तुतीसुमने उधळत त्यांच्या संभाव्य मुख्यमंत्रीपदाबाबत वक्तव्य केले. राज्यातील प्रत्येक विषयाची अजित पवार यांना इत्यंभूत माहिती आहे. पुणे जिल्ह्यात नेमकी कोणाची ताकद आहे. कोणत्या भागात कोणता व्यवसाय चालणार आहे. तसेच कोणत्या बँकेला काय मदत करायची आहे, याची बरोबर माहिती त्यांना असते. ते एकमेव असे मंत्री आहेत, जे सकाळी सात वाजेपासूनच काम सुरू करतात. मी अजूनपर्यंत अजितदादा थकून झोपल्याचे किंवा त्यांना झोपेतून उठायला उशीर झाल्याचे ऐकलेले नाही, असेही सहकार मंत्री पाटील म्हणाले.
जो वक्त की कदर करता है, वक्त उसकी कदर करता है, असे अजितदादांचे काम आहे. आम्ही त्यांना उगाच मानत नाही. अजितदादांवर आम्ही आंधळे प्रेम अजिबात केलेले नाही. कार्यकर्त्याला कसे जगवावे, हे अजितदादांकडून शिकावे. कार्यकर्त्याला जीव लावला की, जीव जाईपर्यंत ते त्यांच्यावर प्रेम करतात. त्यामुळेच मी असेल किंवा अमळनेरचे आमदार अनिल पाटील असतील, आम्ही उगाच त्यांच्याबरोबर जाण्याचा निर्णय घेतला नव्हता, असेदेखील सहकार मंत्री पाटील यांनी नमूद केले.