नाशिक - नागपूर ते मुंबई समृध्दी महामार्गावर जिल्ह्यात सिन्नरच्या वावी आणि इगतपुरी तालुक्यातील घोटी येथे पर्यटन, कृषी प्रक्रिया व यांत्रिकी अभियांत्रिकीशी संबंधित वसाहती विकसित करण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी) नियोजन करत असल्याची माहिती महामंडळाचे सहव्यवस्थापकीय संचालक कैलास जाधव यांनी दिली. नाशिक इंडस्ट्रिज ॲण्ड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (निमा) आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ यांच्या वतीने समृद्धी महामार्गवरील आर्थिक विकासावर कार्यशाळा पार पडली. यावेळी ते बोलत होते. कार्यशाळेत निमाचे अध्यक्ष धनंजय बेळे, सचिव राजेंद्र अहिरे, आयमाचे अध्यक्ष निखिल पांचाळ, नाईसचे रमेश वैश्य, एमएसआरडीसीचे महाव्यवस्थापक राजेश कोटकर आदी उपस्थित होते.नागपूरपासून मुंबईपर्यंत समृद्धी महामार्गालगत औद्योगिक, शिक्षण, पर्यटन, कृषी प्रक्रिया यावर आधारित औद्योगिक नगर उभारली जाणार असल्याचे जाधव यांनी नमूद केले. औद्योगिक, वैद्यकीय अशा वेगवेगळ्या वसाहती उभारल्या जाणार आहेत. या अनुषंगाने महाराष्ट्रात प्रथमच निमामार्फत नाशिक परिसरातील उद्योजकांपर्यंत पोहोचून त्यांच्याकडून उद्योग विस्तारासाठी तसेच नवीन उद्योग उभारणीसाठी जागेची मागणी, गट आणि प्रकाराबाबत माहिती मागविली जाणार आहे. उद्योजकांच्या मागणीनुसार त्या त्या ठिकाणी कोणती वसाहत हवी, याचा निर्णय घेतला जाईल, असे जाधव यांनी स्पष्ट केले. मऔविमनुसार ही जागा दीर्घ मुदतीच्या कराराने उद्योजकांना उपलब्ध करून दिली जाईल. याचे नियोजन प्राधिकरण हे एमएसआरडीसी असणार आहे. या औद्योगिक तसेच इतर वसाहतीतील पायाभूत सुविधाही रस्ते विकास महामंडळच पुरवणार आहे. या प्रकल्पामुळे समृद्धी महामार्गात ज्यांच्या जमिनी गेल्या, त्यांना रोजगार उपलब्ध करून देणे तसेच ग्रामीण भागातील अर्थकारणाला गती मिळणार असून हा महामार्ग खऱ्या अर्थाने संपूर्ण महाराष्ट्राला समृद्धी देणारा ठरणार असल्याकडे जाधव यांनी लक्ष वेधले. हेही वाचा >>>धुळे जिल्ह्यात मनसेचे टोल नाक्यावर आंदोलन, टोल न भरता वाहनांची ये-जा पुढील सात वर्षात नाशिकमधून जाणारा समृद्धी महामार्ग, प्रस्तावित सुरत-चेन्नई हरीत महामार्ग, नाशिक-पुणे सेमी रेल्वे प्रकल्प, तसेच इतर राज्य व राष्ट्रीय महामार्गाचे जाळे यामुळे नाशिकची दळणवळण संपर्क व्यवस्था अत्यंत चांगली होणार आहे. भौगोलिक स्थिती, मुबलक पाणी, वीज, कुशल व अकुशल कामगारांची उपलब्धता, राज्यातील सर्व प्रमुख शहर व राज्यांना जोडणारे रस्ते यामुळे पुढील काळात नाशिक हे संपूर्ण देशाच्या विकासाचे इंजिन ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या निमित्ताने नाशिकला दोन नवीन औद्योगिक वसाहती मिळतील, अशी अपेक्षा निमा अध्यक्ष धनंजय बेळे यांनी व्यक्त केली, उद्योग मंत्र्यांनी इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टरची घोषणा केली आहे. महामार्गावरील निर्धारित जागेचा त्यासाठी विचार करता येईल. अनेक छोटे, मोठे उद्योजक जागेची मागणी करतात. त्यांची गरज या माध्यमातून काही अंशी पूर्ण होऊ शकते. चर्चेत महिंद्रचे भूषण पटवर्धन, जिंदाल लिमिटेडचे सी. चंद्रशेखरन, अनंत राजेगावकर, किरण चव्हाण, एबीबी, भगवती फेरो कास्टिंग, इंडिया डेअरी, रॉयल इक्विपमेंट, आदींसह अनेक उद्योजकांच्या प्रतिनिधींनी सहभाग नोंदविला.