नाशिक – कातकरी वस्ती सुधार योजना लागू करावी, आदिवासी वाडी-वस्तीवर नागरी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, आदी मागण्यांसाठी एल्गार सामाजिक संघटनेच्या वतीने बुधवारी मुंबई येथे आदिवासी विकास मंत्र्यांच्या निवासस्थानी बिऱ्हाड मोर्चा काढण्यात येणार आहे. इगतपुरी तालुक्यातील मुंढेगावपासून बिऱ्हाड मोर्चा मुंबईकडे निघेल, अशी माहिती संघटनेचे भगवान मधे यांनी दिली. कष्टकरी आदिवासी बांधवांना आजही पोटाची खळगी भरण्यासाठी स्थलांतरित व्हावे लागत आहे.
आदिवासी विकास विभाग स्थापन होऊन कित्येक वर्षे झाली असली तरी वस्ती, वाडी, पाड्यावर विकास झालेला नाही. आजही जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, पेठ, निफाड, सिन्नर, कळवण, सुरगाणा, नाशिक, नांदगाव या तालुक्यातील आदिवासींचे प्रश्न तसेच आहेत. कातकरी, भूमिहीन, अपंग, विधवा यांना शबरी घरकुल योजनेत प्राधान्य द्यावे, कातकरी कुटुंबासाठी स्वतंत्र घरकुल योजना राबवावी, आश्रमशाळांचा दर्जा सुधारावा, आठवीपासूनच कौशल्य विकास प्रशिक्षण देण्याची तरतूद करण्यात यावी, पात्र वन दावेदारांच्या जमिनी विकासासाठी निधी उपलब्ध करून द्यावा, आदी मागण्या करण्यात येणार आहेत.