मालेगाव : औरंगजेब ही अत्यंत पवित्र व्यक्ती होती, मात्र केवळ राजकारणासाठी काही लोकांकडून औरंगजेबला महाराष्ट्रात बदनाम करण्यात येत असल्याचे वादग्रस्त वक्तव्य माजी आमदार तथा ‘इस्लाम’ पार्टीचे प्रमुख आसिफ शेख यांनी येथे केले. मालेगाव येथे विलंबाने जन्म दाखले देण्याच्या प्रक्रियेत घोटाळा झाल्याचे प्रकरण गेली पाच महिने गाजत आहे. या प्रक्रियेचा गैरफायदा घेऊन मालेगाव येथून मोठ्या प्रमाणावर बांगलादेशी घुसखोरांना जन्मदाखले वितरित केले गेल्याची तक्रार भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केली आहे. या अनुषंगाने बनावट कागदपत्रांच्या आधारे जन्मदाखले प्राप्त केल्याप्रकरणी चार डझनहून अधिक संशयितांविरोधात पोलिसात गुन्हे दाखल झाले आहेत.
या पार्श्वभूमीवर, भाजपकडून मुस्लिमांना मुद्दाम लक्ष्य केले जात आहे आणि मालेगावची नाहक बदनामी केली जात असल्याचा आसिफ शेख यांचा आक्षेप आहे. शेख आणि समाजवादी पार्टीचे स्थानिक नेते मुस्तकिम डिग्निटी यांनी त्याविरोधात अल्पसंख्यांक सुरक्षा समितीची स्थापना केली आहे. या समितीच्या माध्यमातून जन्मदाखले घोटाळ्यातील संशयितांना कायदेशीर मदत केली जात आहे. तसेच या समितीतर्फे रविवारी येथे मुस्लिम समाजाच्या प्रश्नांवर मंथन करण्यासाठी उत्तर महाराष्ट्र स्तरीय परिषद आयोजित करण्यात आली होती. या परिषदेच्या निमित्ताने माध्यमांशी संवाद साधताना शेख यांनी औरंगजेबचे कौतुक करणारे विधान केले.
औरंगजेब सर्वधर्मसमभाव मानणारा होता, टोप्या विणून आणि त्यांच्या विक्रीतून होणाऱ्या कमाईतून तो स्वतःचा उदरनिर्वाह करीत होता, असेही शेख यानी नमूद केले. अलीकडेच औरंगजेबची कबर हटविण्यावरून महाराष्ट्रात वाद पेटला होता. वादाचा हा धुरळा खाली बसला न बसला तोच शेख यांनी औरंगजेबविषयी गौरवास्पद विधान केल्याने आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.