नाशिक – वादळी पावसात झाडांच्या पडझडीमुळे शहरातील वीज वितरण व्यवस्था वारंवार कोलमडत असून त्याची मोठी झळ नागरी भागासह औद्योगिक क्षेत्राला बसली आहे. झाडांच्या पडझडीमुळे सातपूर औद्योगिक वसाहतीत काही भागात १२ तर, काही भागात २० तास वीज पुरवठा खंडित झाला. यामुळे उद्योगांचे २५ ते ३० कोटींचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.
आठवडाभरापासून शहरात मान्सूनपूर्व पाऊस जोरदार हजेरी लावत आहे. या काळात शहरात विविध भागात सुमारे १५० झाडांची पडझड झाली. सोमवारी वादळी पावसात पुन्हा तशीच स्थिती निर्माण झाली. वाहिन्यांवर झाडे पडत असल्याने वीज पुरवठ्यात अडथळ्यांची मालिका कायम आहे. सातपूर औद्योगिक क्षेत्रात रविवारी १३ ठिकाणी झाडे उन्मळली. त्यामुळे १० ते २० तास वीज पुरवठा खंडित झाला होता. या वसाहतीत वाहन उद्योगातील बड्या कंपन्यांसह शेकडो लधु-मध्यम उद्योजकांचे कारखाने आहेत. दुपारी खंडित झालेला वीज पुरवठा रात्री उशिरापर्यंत पूर्ववत झाला नव्हता. वीज कंपनीचे अधिकारी-कर्मचारी युद्धपातळीवर कार्यप्रवण झाले. परंतु, कोसळलेल्या झाडांची संख्या अधिक असल्याने ते हटविण्यास वेळ लागला. परिणामी, काही भागात वीज पुरवठा पूर्ववत होण्यास सोमवारची पहाट उजाडली.
विजेचा प्रवाह कमी-अधिक होणे, अधुनमधून वीज अंतर्धान पावणे, असे प्रकार सातत्याने घडले. परिणामी, कारखान्यांना अडचणींना तोंड द्यावे लागले. ५० टक्के उद्योग कित्येक तास बंद राहिले. उत्पादनात खंड पडल्याने औद्योगिक क्षेत्रात सुमारे २५ कोटींचे नुकसान झाल्याचा अंदाज नाशिक इंडस्ट्रिज ॲण्ड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे (निमा) उपाध्यक्ष मनिष रावत यांनी व्यक्त केला. तीन दिवसांपूर्वी अशीच स्थिती अंबड औद्योगिक वसाहतीत निर्माण झाली होती.
सातपूर भागात १३ ठिकाणी झाडे पडल्याने दुपारपासून खंडित झालेला वीज पुरवठा रविवारी रात्री साडेबारा वाजेपासून टप्याटप्प्याने पूर्ववत होण्यास सुरुवात झाली. काही झाडांचे आकारमान मोठे होते. ते हटविण्यासाठी अधिक यंत्रसामग्री लागणार होती. सोमवारी सकाळी हे काम करण्यात आले. त्यानंतर काही रोहित्रांवरील वीज पुरवठा सुरळीत झाला. – चेतन वाडे (कार्यकारी अभियंता, महावितरण)