स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा इतरांना इशारा

शेतकरी आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यासाठी १० जुलै रोजी किसान क्रांतीच्या राज्य सुकाणू समितीची बैठक तुपसाखरे लॉन्स येथे होणार असून त्यात आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यात येईल.  शेतकरी आंदोलनात अनेक गट तट तयार झाले आहेत. जे आमच्यासोबत नाही, त्यांना व्यासपीठावर स्थान मिळणार नसल्याचे सूचित करण्यात आले. देशातील शेतकरी हा कर्जमुक्त झालाच पाहिजे तसेच स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी या दोन मुख्य मागण्यांवर बैठक आहे.

या बाबतची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा प्रदेशाध्यक्ष हंसराज वडघुले यांनी पत्रकार परिषदेत दिली. सुकाणू समितीचे सदस्य राजू देसले यांच्यासह विविध शेतकरी संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते. राज्य सुकाणू समितीच्या माध्यमातून आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी होणाऱ्या राज्यस्तरीय बैठकीच्या पाश्र्वभूमीवर, गुरूवारी आयोजित नियोजन बैठकीनंतर ते बोलत होते. किसान क्रांतीच्या आंदोलनात पुणतांबेच्या शेतकऱ्यांनी संप मागे घेण्याचे जाहीर केल्यावर फूट पडली होती. त्यानंतर या आंदोलनाचा केंद्रबिंदू नाशिककडे आला. आंदोलन पुढे सुरू ठेवण्याचा निर्धार करत विविध घटक एका छताखाली जमा झाले. तथापि, हा समन्वय फार काळ टिकला नाही. शरद जोशी प्रणीत शेतकरी संघटनेने सुकाणू समितीच्या कार्यपध्दतीवर आक्षेप घेत स्वतंत्रपणे आपले काम व आंदोलन सुरू ठेवण्याचे जाहीर केले आहे. सुकाणू समितीतील सदस्यांमध्ये बेबनाव झाला. जे आमच्यासोबत नाही, त्यांना व्यासपीठावर येता येणार नसल्याचे वडघुले यांनी स्पष्ट केले.

दरम्यानच्या काळात शासनाने कर्जमाफीची घोषणा करीत आंदोलनाची धार कमी करण्याचा प्रयत्न केला. कर्जमाफीचा लाभ मिळालेल्या शेतकऱ्यांची दिली जाणारी आकडेवारी धुळफेक असल्याचा आरोप सुकाणू समितीचे सदस्य राजू देसले यांनी केला आहे. राज्यस्तरीय बैठकीत सरकारने घोषित केलेल्या फसव्या कर्जमाफीबद्दल शेतकऱ्यांमध्ये प्रबोधन करण्यात येणार आहे. त्यासाठी विविध प्रचार व प्रसार पत्रके वितरित केली जातील.

त्याचे जिल्हानिहाय नियोजन झाले आहे. बैठकीचा पुढील टप्पा म्हणून राज्यस्तरावर २५ जुलै रोजी शेतकऱ्यांचे मोठे आंदोलन होणार आहे. त्याआधी राज्यात ठिकठिकाणी १३ सभा होणार आहेत. या सभेची सुरुवात नाशिक येथून होत आहे. या बैठकीत देशातील शेतकरी संघटनेचे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत.

बैठकीत शेतकऱ्यांच्या विविध मागण्या असल्या तरी प्रामुख्याने देशातील शेतकरी संपूर्ण कर्जमुक्त व्हावा तसेच स्वामीनाथन सूत्रानुसार शेतमालाला दीडपट हमी भाव देण्यात यावा ही मागणी करण्यात येणार आहे.या मागण्या मान्य होण्यासाठी तसेच त्यावर चर्चा होण्यासाठी राजकीय मंडळींना व्यासपीठ खुले असल्याचे त्यांनी सांगितले.

किसान सभेतर्फे आज मोर्चा

नाशिक जिल्ह्यातील पॉलीहाऊस व शेडनेटधारक शेतकरी सरसकट कर्जमुक्तीपासून वंचित राहत आहेत. त्या सर्व शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ मिळावा या मागणीसाठी किसान सभेतर्फे शुक्रवारी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. शेतकरी संपानंतर राज्य शासनाने दीड लाखपर्यंतची थकीत कर्ज माफ करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयावरून शेतकरी संघटनांमध्ये वेगवेगळे मतप्रवाह आहेत. सुकाणू समितीने शासनाने जाहीर केलेली लाभार्थी शेतकऱ्यांची यादी फसवी असल्याचा आरोप केला. कर्जमाफीच्या प्रश्नावर शेतीशी संबंधित इतर घटकही मैदानात उतरत आहे. कर्जमाफीच्या निर्णयात शेडनेटधारक व पॉलीहाऊसधारक शेतकऱ्यांना वगळण्यात आले. आपल्या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी किसान सभेच्या नेतृत्वाखाली संबंधितांकडून मोर्चा काढण्यात येणार आहे. बी. डी. भालेकर मैदान येथून सकाळी साडे अकरा वाजता हा मोर्चा निघणार असल्याची माहिती किसान सभेचे जिल्हाध्यक्ष राजू देसले यांनी दिली. शेतकऱ्यांनी मोर्चात सहभागी व्हावे, असे आवाहन संजय गोवर्धने, पांडुरंग गडकरी, पंढरीनाथ पिंगळे आदींनी केले आहे.

मध्यप्रदेशातून अस्थिकलश यात्रा

अखिल भारतीय किसान संघर्ष समितीच्यावतीने मध्यप्रदेश येथील मनसोर येथून सात अस्थिकलश घेऊन यात्रा निघणार आहे. यामध्ये मनसोर येथे झालेल्या शेतकरी संघर्षांतील सहा हुतात्म्यांचे सहा कलश व संपूर्ण देशात आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांचा प्रातिनिधीक स्वरूपातील कलश यात्रेत सहभागी होईल. ही यात्रा ९ जुलै रोजी चांदवड येथील टेहरे गावात येणार आहे. यावेळी चांदवड येथे सभा होणार आहे. १० जुलै रोजी चांदवड येथून दुचाकी रॅली व संघर्ष यात्रा नाशिक येथे येईल. यासाठी सर्व शेतकरी संघटनेच्या प्रतिनिधींशी चर्चा करण्यात आली आहे.