नाशिक – सिन्नर, डुबेरे भागात मागील २४ तासात अनुक्रमे १५० आणि १४५ मिलीमीटर पाऊस झाला. सिन्नर तालुक्यात सहा घरांची पडझड झाली. काढणीवर आलेला व शेतात काढून ठेवलेल्या कांद्याचे मोठे नुकसान झाले. रविवारच्या पावसात जिल्ह्यातील सहा तालुक्यांत १३२ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. यात सर्वाधिक १०२ हेक्टर क्षेत्र कांद्याचे असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. सहा ते २५ मे या कालावधीत पावसाने १०९२ घरांची पडझड झाली. तर या काळात १६ गोठ्यांचे नुकसान झाले.

सहा मेपासून जिल्ह्यात वादळी पाऊस हजेरी लावत आहे. मध्यंतरी त्याने दोन, तीन दिवस उघडीप घेतली होती. परंतु, रविवारी त्याने सिन्नरसह काही भागास पुन्हा झोडपले. सोमवारी सकाळपर्यंत म्हणजे मागील २४ तासात सिन्नर गटात १५०.३, डुबेरे १४५.२, वावी ६८.४, शहा ४२.८, नांदूरशिंगोटे ३८, देवपूर ३२ आणि पांढुर्ली गटात ९.३ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. या काळात सहा घरांची पडझड झाली. मरळ बुद्रुक येथील मच्छिंद्र म्हस्के यांच्या कांद्याचे नुकसान झाले. खोपडी येथे संजय गवळी या शेतकऱ्याचे घर पावसात पडले.

पावसाचा फटका कमी-अधिक प्रमाणात अन्य पाच तालुक्यांनाही बसला. कृषी विभागाच्या प्राथमिक अहवालानुसार रविवारच्या पावसात सहा तालुक्यातील ४४ गावांतील २३१ शेतकरी बाधित झाले. एकूण १३२ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. यामध्ये १०२ हेक्टरवरील कांदा, पावणेदोन हेक्टरवरील बाजरी, ११ हेक्टरवरील भाजीपाला, साडेपाच हेक्टरवरील डाळिंबाचा समावेश आहे. नाशिक तालुक्यात ११ गावांतील (११३ शेतकरी), सिन्नर ११ गावे (४४ शेतकरी), निफाड पाच (५३), नांदगाव सहा (१६), कळवण दोन (चार शेतकरी) येवला एक गाव (एक शेतकरी ) यांचा बाधितांमध्ये समावेश आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मेमधील आजपर्यंतचे नुकसान

सहा ते २५ मे या कालावधीत ७०१ कच्च्या घरांचे तर ३९० पक्क्या घरांचे जिल्ह्यात नुकसान झाले. एका घराची पूर्णत: पडझड झाली. लहान-मोठी ४६ जनावरे मृत्युमुखी पडली. तर ओढकाम करणाऱ्या ६० पशूधनाची हानी झाली. या काळात १६ गोठे नष्ट झाले. नऊ सार्वजनिक मालमत्तांचे नुकसान झाल्याचा प्रशासनाचा अहवाल आहे. बागलाण तालुक्यात १६ मे रोजी कुक्कुटपालन केंद्रातील ७५ पक्ष्यांचा मृत्यू झाला.