मनमाड : भर पावसाळ्यात तीव्र टंचाई सोसणाऱ्या मनमाडकरांना पालखेड धरणातून सोडण्यात आलेल्या पूर पाण्यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. सोमवारी पालखेडमधून सोडण्यात आलेले पाणी मनमाड नगरपालिकेच्या पाटोदा येथील साठवणूक तलावात पोहचले. ते वाघदर्डी धरणात घेतले जाईल. त्यामुळे मनमाड शहराची तहान भागणार आहे. गेल्या आठवड्यात जिल्ह्यात सर्वत्र झालेल्या पावसामुळे धरणे ओसंडून वाहू लागली. पालखेड धरण जवळपास ८४ टक्के भरले. त्यामुळे या धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात आला.
सोमवारी हे पाणी मनमाडच्या साठवणूक तलावात आले. पाटोदा येथे पालिकेने हे पाणी पूर्ण क्षमतेने उचलण्यासाठी यंत्रणा सक्षम ठेवली होती. त्यामुळे हे पाणी पूर्ण क्षमतेने पंपिंगद्वारे वाघदर्डी धरणात घेतले जात आहे. त्यामुळे पाणी टंचाईचे चटके सोसणार्या मनमाडकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. पाणी पूर्ण क्षमतेने उचलण्यासाठी २७० अश्वशक्तीचे तीन आणि २०० अश्वशक्तीचे दोन पंप सज्ज असून त्याद्वारे पाण्याचा उपसा केला जात आहे.
पालखेड धरणाचे पूर पाणी सोडण्यात येणार असल्याने पाटोदा येथील सहा पंप आणि अन्य यंत्रणेची देखभाल दुरुस्तीची कामे करण्यात आली. हे पूर पाणी वाघदर्डी धरणात घेतले जात आहे. या पूर पाण्यामुळे मनमाड शहराची पाणी टंचाईची दाहकता काही अंशी कमी होईल, अशी अपेक्षा आहे. पालिकेचे मुख्याधिकारी शेषराव चौधरी यांच्या नेतृत्वाखाली पाणीपुरवठा अभियंता व कर्मचारी परिस्थितीवर नियंत्रण ठेवून आहे.
हेही वाचा : नाशिक शहरातील बस, रिक्षा आंदोलनांमागे श्रमिक सेनेचा असाही योगायोग
‘पालखेडचे पूर पाणी पाटोदा येथे पोहचले आहे. तेथे सर्व यंत्रणा सक्षमपणे कार्यान्वित असल्याने जास्तीत जास्त पाण्याचा उपसा करून ते वाघदर्डी धरणात घेतले जात आहे. या पूर पाण्याचा मनमाडकरांना फायदा होणार आहे. पाणीटंचाई काही अंशी दूर होण्यास मदत होई’, असे शेषराव चौधरी (मुख्याधिकारी, मनमाड नगरपालिका) यांनी म्हटले आहे.