नाशिकमधील सुराणा ज्वेलर्सवर प्राप्तिकर विभागाने धाड टाकून ३० तास शोध मोहिम राबविली. यानंतर ज्वेलर्समधून २६ कोटींची रोकड जप्त करण्यात आली आहे. तर ९० कोटींच्य संपत्तीचे कागदपत्रेही ताब्यात घेण्यात आली आहेत. नागपूर आणि जळगावमधील अधिकाऱ्यांनी एकत्र येऊन ही कारवाई केली आहे. जप्त केलेली रोकड मोजण्यासाठी अधिकाऱ्यांना १४ तासांचा वेळ लागला.

गेल्या काही दिवसांत महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात प्राप्तिकर विभागाकडून कारवाई होत आहेत. काही दिवसांपूर्वी नांदेडमधील संजय भंडारी नावाच्या व्यावसायिकावर अशाचप्रकारे कारवाई करत १७० कोटींची बेहिशोबी मालमत्तेवर टाच आणली होती. तर धाडीत १४ कोटींची रोकड आणि ८ किलो दागिने जप्त केले होते. त्यानंतर नाशिकमध्ये मोठी कारवाई झाल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

प्राप्तिकर विभागाने शनिवारी सकाळी कारवाई करण्यासाठी ज्वेलर्सच्या दुकानावर धाड टाकली. अधिकाऱ्यांच्या पथकाने दिवसभर आर्थिक व्यवहारांचे कागदपत्र, घेवाण-देवाण संबंधी व्यवहार त्याचे दस्ताऐवज तपासले. सलग ३० तास ही कारवाई सुरू होती. प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी सुराणा ज्वेलर्स आणि त्यांच्याशी संबंधित रिअल इस्टेट व्यवसायाच्या कार्यालयातही धाड टाकली. तसेत नाशिकच्या राका कॉलनीमध्ये असलेल्या बंगल्यावरही स्वतंत्र पथकाकडून शोधमोहीम राबविली गेली.