जळगाव : शहरात रस्तेकामे सुरू आहेत; पण कामे करताना रस्त्यालगत असलेल्या जलवाहिन्यांचे व्हॉल्व्हही बुजविल्याचे प्रकार घडले आहेत. त्यामुळे पाणी सोडण्यावेळी अडचणी निर्माण झाल्या आहेत. जळगावकरांना २४ तास पाणीपुरवठा करण्यासाठी अमृत योजना दोन टप्प्यांत राबविण्यात येत आहे. ती पूर्ण करण्याची मुदत दोन वर्षांची असताना कामे पूर्ण होण्यास सहा वर्षे लागली. पहिल्या टप्प्यातील ९५ टक्के काम झाले असून, ८० हजारांवर नळजोडण्या दिल्या गेल्या. दुसर्‍या टप्प्यांतर्गत महापालिका प्रशासनाने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला पाठविलेल्या प्रकल्प अहवालास राज्य सरकारकडून जानेवारी २०२४ अखेर मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. त्यानंतर पुढील दोन महिन्यांत निविदाप्रक्रिया पूर्ण होऊन कार्यादेश दिले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे शहरातील सर्व नळांना मीटर बसविण्यात येऊन पुढील दिवाळीपर्यंत जळगावकरांना २४ तास पाणीपुरवठा सुरू केला जाईल, असा दावा महापालिका पाणीपुरवठा विभागातर्फे करण्यात आला आहे. त्यानंतर जुनी जलवाहिनी बंद होणार आहे.

हेही वाचा : कचरा जाळण्यास विरोधामुळे टोळक्याची मारहाण, विनयभंग

रस्तेकामांसाठी शासनाकडून प्राप्त झालेल्या स्वतंत्रपणे कोट्यवधींचा निधीतून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून पहिल्या टप्प्यात ४२ कोटींची कामे रडखडत का होईना सुरू झाली आहेत. मध्यंतरी अमृत योजनेंतर्गत नळजोडण्यांसाठी चार्‍या खोदल्यामुळे रस्तेकामे थांबविण्यात आली होती. आता ती वेगाने सुरू झाली आहेत. अमृत योजनेंतर्गत शहरात टाकण्यात आलेल्या जलवाहिन्यांवर व्हॉल्व्ह बसविण्यात आले आहेत. सुमारे एक हजार जोडण्यांमध्ये एक व्हॉल्व्ह बसविण्यात आला. काही भागांत व्हॉल्व्ह मुख्य रस्त्यालगत, तसेच उपनगरांतील गल्लीबोळांमध्ये, चौकांमध्ये व्हॉल्व्ह तीन फुटांवर आहेत.

हेही वाचा : पदवी, पदव्युत्तर प्रमाणपत्रांची सांकेतांकाने पडताळणी दृष्टीपथात, बुधवारी मुक्त विद्यापीठाच्या दीक्षांत सोहळ्यात वितरण

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आता रस्तेकामे करताना मक्तेदारांच्या कर्मचार्‍यांची निष्काळजी दिसून येत असून, ती करताना जलवाहिन्यांवरील व्हॉल्व्ह बुजविले गेले आहेत. त्यामुळे नियोजित वेळापत्रकाप्रमाणे पाणी सोडताना कर्मचार्‍यांची बुजविले गेलेले व्हॉल्व्ह मोकळे करताना चांगलीच तारांबळ उडत आहे. पाणी सोडणारे कर्मचारी स्वतः व्हॉल्व्ह मोकळे करीत आहेत. रस्तेकामे करताना महापालिका पाणीपुरवठा विभागाच्या अधिकार्‍यांनी लक्ष देण्याची गरज होती. मात्र, त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष झाले. शहरात अमृत योजनेंतर्गत टाकण्यात आलेल्या जलवाहिन्यांवर व्हॉल्व्ह किती बसविण्यात आले आहेत, अशी विचारणा केल्यानंतर यासंदर्भात महापालिका पाणीपुरवठा विभागाकडे माहितीच उपलब्ध नसल्याचे उघड झाले.