जळगाव – संपावरील कर्मचारी कामावर परतल्याचा दावा केला जात असताना, शहरात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग साचल्याचे दिसून येत होते. त्यावर ‘लोकसत्ता’ने प्रकाशझोत टाकल्यानंतर जाग आलेल्या महापालिका प्रशासनाने सोमवारपासून साचलेला कचरा उचलण्यास सुरूवात केली.
वेतन थकल्याचे कारण देत वॉटरग्रेससाठी काम करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांनी १७ तारखेपासून काम बंद आंदोलन सुरु केले. परिणामी, शहरात प्रचंड कचरा साचला. विविध भागात घंटागाड्या पोहोचल्या नाहीत. अनेक ठिकाणी गटारांची स्वच्छता थांबली. दरम्यान, महापालिका प्रशासनाने वॉटरग्रेसला नोटीस बजावली. साडेतीन लाखांचा दंडही ठोठावला. प्रत्यक्षात, संबंधित कंत्राटदाराला दोन कोटी रुपयांचे थकीत वेतन मिळाल्यानंतरच सफाई कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न सुटला. आणि कर्मचारी कामावर परतल्याचे सांगण्यात आले. प्रत्यक्षात, संप मिटल्यानंतर देखील वॉटरग्रेसने पूर्ण क्षमतेने कर्मचारी शहर स्वच्छतेच्या कामासाठी कार्यरत केले नाही. परिणामी, ज्या ठिकाणी संपाच्या काळात कचरा साचला होता, तिथे आणखी मोठे कचऱ्याचे ढीग जमा झाले. संप मिटल्यानंतर परिस्थिती पूर्वपदावर येण्याऐवजी उलट आणखी बिकट झाली.
पावसाळ्याचे दिवस असल्याने ठिकठिकाणी साचलेल्या कचऱ्यामुळे रोगराई पसरण्याची शक्यता लक्षात घेता, त्या विषयी ‘लोकसत्ता’ने प्रकाशझोत टाकला. त्यानंतर महापालिकेचे झोपलेले प्रशासन जागे होऊन कामाला लागले. विशेष म्हणजे शहर स्वच्छतेचे कंत्राट वॉटरग्रेसला दिलेले असले, तरी महापालिकेची यंत्रणा स्वतःच कचरा उचलण्याचे काम करताना दिसली. उशिरा का होईना कचरा उचलला जात असल्याचे बघून नागरिकांनीही समाधान व्यक्त केले. पुन्हा कचऱ्याचे ढीग साचणार नाहीत, याची काळजी घेण्याची अपेक्षाही बोलून दाखवली.