मनमाड : शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या वागदर्डी धरण ते छत्रपती शिवाजी महाराज चौक पाण्याच्या टाकीदरम्यान असलेली मुख्य जलवाहिनी जेसीबीची धडक बसल्याने फुटून हजारो लिटर पाणी वाहून गेले. पांझण- रामगुळणा संगमावर हा अपघात झाला. यामुळे तीन, चार दिवस काही भागातील पाणी पुरवठा विस्कळीत होणार आहे.
जेसीबी यंत्राद्वारे नदीतील पाणवेली काढल्या जात असताना हा अपघात झाला. या घटनेमुळे मनमाड शहरातील गावठाण, चंदनवाडी, गर्डरशॉप आदी भागातील पाणी पुरवठा विस्कळीत व अनियमित होण्याची शक्यता आहे. शुक्रवारी सायंकाळी दत्त मंदिराजवळील पांझण- रामगुळणा संगमावरील पुलाखाली गणेशकुंड भागात नगरपालिकेतर्फे पानवेली आणि गाळ काढण्याची मोहीम सुरू आहे. जेसीबी यंत्राद्वारे नदीपात्रात उतरून पानवेली काढल्या जात असतांना चालकाला अंदाज न आल्याने मुख्य वाहिनीला धडक बसून ती फुटली. तिला मोठे भगदाड पडून रात्री उशीरापर्यंत हजारो लिटर पाणी वाहून गेले्. ही जलवाहिनी जुनी असल्याने दुरुस्तीला तीन ते चार दिवस लागण्याचा अंदाज आहे.
मनमाड शहराला सध्या १३ ते १५ दिवसाआड पाणीपुरवठा सुरू आहे. मध्यंतरीच्या पावसामुळे विद्युत पुरवठा खंडित झाला. त्यात विस्कळीतपणा आला आहे. त्यातच ही जलवाहिनी फुटल्याने पुन्हा काही दिवस पाणीपुरवठा अनियमित होण्याची शक्यता आहे.
मनमाड शहराचा पाणीपुरवठा सध्याच्या वितरण व्यवस्थेत शक्यतो विस्कळीत होणार नाही, याची काळजी घेण्यात येत आहे. फुटलेल्या जलवाहिनीची तातडीने दुरूस्ती करण्याबाबतचे आदेश कंत्राटदारांना देण्यात आले आहेत. नागरिकांनी पाणी काटकसरीने वापरावे. शेषराव चौधरी (प्रशासक तथा मुख्याधिकारी, मनमाड नगरपालिका)