मनमाड – शहराला कायमस्वरूपी पाणीपुरवठा करणाऱ्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे करंजवण मनमाड पाणीपुरवठा योजनेचे लोकार्पण आणि मनमाड शहरासाठी ३५० कोटी रुपये खर्च करून राबविण्यात येणाऱ्या भूमिगत गटार योजनेचे भूमिपूजन ३० जुलैच्या आत करण्याचे नियोजन आहे. करंजवण मनमाड पाणीपुरवठा योजनेच्या चाचणीत काही किरकोळ त्रुटी दिसून आल्या होत्या. त्या दूर करण्याच्या सूचना आमदार सुहास कांदे यानी केल्या आहेत.

मनमाडकरांच्या घराघरात लवकरच करंजवण योजनेचे पाणी पोहचण्याचा विश्वास आमदारा कांदे यांनी व्यक्त केला. महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून कांदे यांच्या पाठपुराव्यातून राबविण्यात आलेल्या सुमारे ४५० कोटी रुपये खर्चाच्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे करंजवण मनमाड पाणीपुरवठा योजनेचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर, त्यांनी नव्याने उभारण्यात आलेल्या तंत्रज्ञानयुक्त जलशुद्धीकरण केंद्राला भेट दिली. या केंद्राची पाहणी केली.

सध्या करंजवण येथून सोडण्यात आलेले पाणी भारतनगर जवळील जलशुद्धीकरण केंद्रात अतिशय वेगाने येत असून त्याचे जलशुद्धीकरणही सुरू आहे. याची पाहणी केल्यानंतर कांदे यांनी माध्यमांशी संवाद साधला. तत्कालीन मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या सर्व योजनेसाठी मोलाची मदत केली. ४५० कोटींच्या या योजनेसाठी १५ टक्के स्वनिधी नगरपालिकेला भरावा लागतो. म्हणजे सुमारे ८० कोटी रुपये इतका निधी नगरपालिकेला भरावा लागणार होता. परंतु, नगरपालिकेची आर्थिक परिस्थिती विचारात घेऊन शासनाने हा स्वनिधी दिला आहे. राज्यातील मनमाड ही यासाठी एकमेव नगरपालिका ठरली.

मनमाडकरांना या योजनेद्वारे मुबलक दररोज पाणी पुरवठा होणार आहे, ३० जुलैच्या आत करंजवण मनमाड पाणीपुरवठा योजनेचे लोकार्पण आणि मनमाड शहरासाठी राबवण्यात येणाऱ्या भूमिगत गटार योजनेच्या कामाचे भूमिपूजन असे दोन्ही कार्यक्रम करण्याचा आपला मानस असल्याचे कांदे यांनी सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

३५० कोटी रुपये खर्चाच्या भूमिगत गटार योजनेच्या कामाचे प्राकलन तयार करण्यात आले. त्या अंतर्गत सांडपाण्यावर प्रक्रिया केंद्र उभारण्यात येणार आहे. गटारीचे सांडपाणी स्वच्छ करून ते रेल्वेला देण्यात येणार आहे. यापोटी मनमाड नगरपालिकेला वर्षाकाठी एक ते दीड कोटी रुपयांचा निधी उपलब्ध होईल. नगरपालिका कर्ज काढणार असल्याची अफवा पसरवली जात असून त्यात तथ्य नसल्याचे कादे यांनी म्हटले आहे.