नाशिक – नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या कुंभमेळ्यास कमी कालावधी बाकी असताना विविध स्वरुपाच्या विकास कामांना अद्याप सुरुवात झालेली नाही. आगामी कुंभमेळा साधू-महंतांसह भाविकांसाठी महत्वाचा आहे. प्रशासन सर्व कामे वेळेत पूर्ण करण्याचे नियोजन करीत आहे. साधुग्रामसाठी भूसंपादन करताना शेतकऱ्यांना विश्वासात घेतले जाईल, असे आश्वासन देण्यात आले.
जिल्हाधिकारी जलज शर्मा, मनपा आयुक्त मनिषा खत्री, कुंभमेळा विकास प्राधिकरणाच्या आयुक्त करिष्मा नायर, उपविभागीय अधिकारी अर्पिता ठुबे आदींनी पंचवटीतील पंचमुखी हनुमान मंदिर, श्री दिगंबर अनी आखाडा, श्री लक्ष्मी नारायण मंदिर, तपोवनातील कपिला संगम येथे भेट देत साधू, महंतांशी संवाद साधला. आगामी कुंभमेळ्यासाठी दोन वर्षांचा कालावधी राहिला असून विविध विकास कामांना गती देण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून क्षेत्रीय पातळीवर भेट देऊन कामांची पाहणी आणि साधू, महंतांशी संवाद साधत असल्याकडे जिल्हाधिकारी शर्मा यांनी लक्ष वेधले.
आगामी कुंभमेळा स्वच्छ, पर्यावरणपूरक, सुरक्षित होईल, असे नियोजन करण्यात आले आहे. साधू, महंतांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी उपजिल्हाधिकारी दर्जाचा अधिकारी नियुक्त करण्यात आला आहे. त्यामुळे साधू, महंत यांच्या अडचणी, समस्या प्राधान्याने सोडविण्यात येतील. साधुग्रामसाठी भूसंपादन करताना शेतकऱ्यांना विश्वासात घेऊनच निर्णय घेतला जाईल असे जिल्हाधिकारी शर्मा यांनी तपोवनातील शेतकऱ्यांशी संवाद साधताना सांगितले.
कुंभमेळ्यासाठी महापालिकेसह विविध शासकीय विभागांनी १५ ते २० हजार कोटींच्या कामांचे आराखडे सादर केले आहेत. यातील काही कामांना यापूर्वीच शासनाकडून मान्यता मिळाली. निधीअभावी काही कामे सुरू झाले नसल्याचे सांगितले जाते. अलीकडेच अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी सिंहस्थ कामांचा आढावा घेतला होता. पाहणी दौऱ्यात कुंभमेळ्याची कामे कधी सुरू होतील, यावर जिल्हाधिकारी शर्मा यांनी भाष्य केले. दीर्घ कालावधीची कामे पावसाळा संपताच सुरू केली जातील, असे त्यांनी म्हटले आहे. पावसाचा हंगाम अखेरच्या टप्प्यात असून त्यानंतर कामांचा श्रीगणेशा करण्याचे नियोजन आहे.
यावेळी उपजिल्हाधिकारी रवींद्र भारदे, पोलीस उपायुक्त चंदक्रांत खांडवी, तहसीलदार अमोल निकम, राष्ट्रीय आखाडा परिषदेचे प्रवक्ते महंत डॉ. रामकिशोर शास्त्री, दिगंबर आखाड्याचे महंत भक्तीचरणदास महाराज, रामस्नेहीदास महाराज, महंत शंकरदास महाराज, माधवदास राठी आदी उपस्थित होते.
तपोवनात कायमस्वरुपी पोलीस चौकी
तपोवन येथे साधुग्रामची उभारणी करण्यात येणार आहे. अधिकाऱ्यांनी या जागेची साधू, महंत यांच्यासमवेत पाहणी केली. नंतर कपिला संगम येथे भेट देत राम सृष्टीची पाहणी करून आरती करण्यात आली. आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर देशभरातून साधू, महंत येतील. त्यांच्यासाठी आवश्यक पायाभूत सोयी-सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, तपोवन येथे कायमस्वरूपी पोलीस चौकी कार्यान्वित करावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.