नाशिक – मराठी भाषेच्या मुद्द्यावरुन एकिकडे राज ठाकरे अध्यक्ष असलेला महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष आणि उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आक्रमक झालेले आहेत. मुंबईसह इतरत्र होणाऱ्या महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हे दोन्ही पक्ष मराठी भाषेचा विषय मांडत असल्याचे सत्ताधारी महायुतीचा दावा आहे. राजकीय पातळीवर मराठी भाषा अशी पुन्हा चर्चेत आली असताना नाशिकमध्येही मराठी भाषेच्या विषयावर काही बिगर राजकीय मंडळी ऑगस्ट महिन्यात एकत्र येत आहेत.
ज्ञानपीठप्राप्त कविववर्य कुसुमाग्रज तथा वि. वा. शिरवाडकर यांच्या नगरीत मराठी भाषेसंदर्भात जागर होणार आहे. त्यासाठी कुसुमाग्रज मराठी विचार मंचने पुढाकार घेतला आहे. मंचतर्फे पहिल्या अखिल भारतीय मराठी भाषा-संस्कृती परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक, कवी, भाषा अभ्यासक डॉ. श्रीपाद जोशी यांची तर स्वागताध्यक्ष म्हणून मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे यांची निवड करण्यात आली आहे. याबाबतची घोषणा कुसुमाग्रज मराठी विचार मंचचे अध्यक्ष सतीश बोरा, सरचिटणीस सुभाष सबनीस यांनी केली आहे.
नऊ आणि १० ऑगस्ट रोजी मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या रावसाहेब थोरात सभागृह आणि व्यवस्थापनशास्त्र महाविद्यालयाच्या प्रांगणात ही परिषद होणार आहे. या दोन दिवसीय परिषदेमध्ये भारतातील ज्येष्ठ विचारवंत, मराठी भाषेचे अभ्यासक, तत्त्ववेत्ते हे उपस्थित राहून भाषाविषयक समाज जागृती संदर्भात विचार मंथन करणार आहेत. कुसुमाग्रज मराठी विचार मंचच्या कार्यकारिणी सभेमध्ये या विषयावर चर्चा झाली. सर्वानुमते जोशी आणि ठाकरे यांची अनुक्रमे परिषदेचे अध्यक्ष आणि स्वागताध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. जोशी हे अनेक वर्षांपासून मराठी भाषा चळवळीचे काम करीत आहेत. मराठी भाषा सुदृढ करण्यासाठी सतत प्रयत्नरत असतात. शासनाच्या मराठी भाषा समितीचे सदस्य, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे माजी अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे. ॲड. ठाकरे हे महाराष्ट्र साहित्य परिषदेचे नाशिक जिल्हा प्रतिनिधी, नाशिक वकील संघाचे अध्यक्ष, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे नाशिक जिल्हा केंद्राचे अध्यक्ष, मराठा विद्या प्रसारक समाज, नाशिक संस्थेचे सरचिटणीस आहेत. महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाचे सल्लागार म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे.
सभेला उपाध्यक्ष दिलीप बारवकर, खजिनदार जयप्रकाश मुथा, विश्वस्त सुहासिनी वाघमारे, शिरीष देशपांडे, प्रकाश शिंपी, नंदकिशोर ठोंबरे हे उपस्थित होते. लवकरच परिषदेच्या कार्यक्रमाचे नियोजन तसेच कार्यक्रम पत्रिका निश्चित करण्यासाठी नाशिकमधील सर्व साहित्य, सांस्कृतिक संस्थांचे पदाधिकारी, भाषा अभ्यासक, मराठीचे प्राध्यापक यांची संयुक्त विचारसभा आयोजित करण्यात येणार आहे. ही संयुक्त सभा स्वागताध्यक्ष ॲड. ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली होणार असल्याची माहिती संस्थेचे सरचिटणीस सबनीस यांनी दिली.
मराठी भाषेसाठी पहिली परिषद
मराठी भाषेला अभिजात भाषेचा साज मिळाला खरा; परंतु मराठी राजभाषा, ज्ञानभाषा, व्यवहार भाषा व्हावी म्हणून प्रयत्न करणे आवश्यक आहे. मराठी भाषा आणि संस्कृती या संदर्भामध्ये आणि एकूणच मराठी भाषेचा विविधांगी सविस्तर अभ्यास व्हावा, यावर सखोल विचार मंथन व्हावे म्हणून नाशिक येथे कुसुमाग्रज मराठी विचार मंच यांच्या पुढाकाराने पहिली अखिल भारतीय मराठी भाषा-संस्कृती परिषद आयोजित करण्यात आली आहे.