शफी पठाण, लोकसत्ता
नाशिक : अध्यक्षांशिवाय होणारे उस्मानाबादनंतरचे हे सलग दुसरे संमेलन आहे. बिनविरोध अध्यक्ष निवडला जाणे चांगलीच गोष्ट आहे. पण, तो अध्यक्ष चालता बोलता हवा, असे आता साहित्यप्रेमीच म्हणू लागले आहेत, याला कारणही तसेच आहे. अध्यक्षांच्या प्रकृतीमुळे संमेलन अडचणीत यायला लागले आहे, असे सूचक वक्तव्य साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी केले. यासह त्यांनी नारळीकरांच्या अनुपिस्थतीवरही उघड नाराजी व्यक्त केली.
ही नाराजी व्यक्त करताना त्यांनी गेल्या संमेलनाचे अध्यक्ष फादर दिब्रिटो यांचा दाखला दिला. पाटील म्हणाले, उस्मानाबादच्या संमेलनावेळी फादर यांची प्रकृती बरी नव्हती. त्यांना उभेही राहता येत नव्हते आणि त्यावेळी त्यांना संमेलनस्थळी आणण्यासाठी कुणी विमानाचा पर्यायही दिला नव्हता. तरी फादर दिब्रिटो संमेलनाला आले. डॉ. नारळीकरांनाही केवळ उद्घाटनापुरते तरी येता आले असते. आयोजकांनी त्यांना सर्व सुविधा उपलब्ध करून देण्याची हमी दिल्यावरही ते का आले नसावेत, असा प्रश्नही ठाले पाटलांनी उपस्थित केला. हेमंत टकले यांनी ठाले पाटील यांच्या आधी विश्वास पाटलांना बोलायला निमंत्रित केले. त्यावरही ठाले पाटलांनी आपल्या खास शैलीत टोला हाणला.
खाद्य मेजवानी
संमेलनास येणाऱ्या साहित्यप्रेमींसाठी खाद्य मेजवानी आहे. संमेलनाच्या पहिल्या दिवशी कोकणस्थी ब्राह्मणी, खानदेशी पद्धतीचे भोजन, खाद्यपदार्थ ठेवण्यात आले होते. शनिवारी सकाळी मराठवाडा तर सायंकाळी वैदर्भिय खाद्यपदार्थाची रेलचेल राहणार आहे.