मालेगाव : महिन्याभरापासून दडी मारलेल्या पावसामुळे मालेगाव तालुक्यात पिके करपू लागल्याने उत्पन्नात घट होणार आहे. त्यामुळे पीक विमा काढलेल्या शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यात झालेल्या नुकसानीची २५ टक्के भरपाई मिळावी, यासाठी शेतकऱ्यांनी विमा कंपन्यांकडे तक्रार करावी, त्यासाठी प्रशासनाच्या माध्यमातून पुढाकार घेण्याचे निर्देश सार्वजनिक बांधकाममंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांनी दिले आहेत.
शासनाने या वर्षापासून उपलब्ध करून दिलेल्या एक रुपयात पीक विमा या योजनेत आतापर्यंत तालुक्यातील ९३ हजार शेतकरी सहभागी झाले असल्याची माहिती भुसे यांनी दिली.

भुसे यांच्या उपस्थितीत येथे दुष्काळसदृष्य स्थितीचा आढावा घेण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती. अप्पर जिल्हाधिकारी माया पाटोळे, प्रांताधिकारी नितिन सदगीर, उपविभागीय कृषी अधिकारी गोकुळ अहिरे, तालुका कृषी अधिकारी भगवान गोर्डे, गटविकास अधिकारी भरत वेंदे आदी या बैठकीस उपस्थित होते. यंदा आतापर्यंत जिल्ह्यात पुरेसा पाऊस झालेला नाही. त्यामुळे टँकरद्वारे पाणी पुरवठा होत असलेल्या गावांची संख्या वाढत असल्याचे नमूद करीत खरीप हंगामात पिकांना पाणी न मिळाल्याने उत्पादन घटणार असल्याकडे भुसे यांनी लक्ष वेधले.

हेही वाचा : नाफेडची १० केंद्रे कार्यान्वित, शेतकऱ्यांचा अल्प प्रतिसाद

बैठकीत तालुक्यातील सरपंचांनी आपापल्या गावातील समस्यांचा पाढा वाचला. त्यावर संबंधित यंत्रणांच्या माध्यमातून या समस्या तत्काळ सोडविण्यात येतील, असे आश्वासन भुसे यांनी दिले. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी ई-पीक नोंदणी करावी, असे सांगत विहिरींमधील उपलब्ध पाणी पिकांना वेळेवर देता यावे म्हणून वीज वितरण कंपनीने सुरळीत वीज पुरवठा सुरु ठेवण्याची दक्षता घ्यावी,असेही त्यांनी सूचित केले.

हेही वाचा : छगन भुजबळ यांना शिवीगाळ करणारा ताब्यात

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सरासरीच्या केवळ २० टक्के पाऊस

मालेगाव तालुक्याचे सरासरी पर्जन्यमान ५६८ मिलीमीटर इतके आहे. गेल्या वर्षी आजच्या तारखेपर्यंत तालुक्यात ४२१ मिलीमीटर पाऊस झाला होता. यंदा मात्र केवळ १२१ मिलीमीटर म्हणजे सरासरीच्या केवळ २० टक्केच पाऊस झाला आहे. या पार्श्वभूमीवर, निर्माण झालेली संभाव्य टंचाईसदृश परिस्थिती पाहता पाण्याचे योग्य नियोजन करुन प्रत्येक गावाने पाण्याचा वापर काळजीपूर्वक व काटेकोरपणे करावा, अशी सूचना भुसे यांनी दिली. अजून काही दिवस पावसाची अवकृपा राहिल्यास परिस्थिती अधिक बिघडण्याची शक्यता भुसे यांनी व्यक्त केली. संभाव्य टंचाईला तोंड देण्यासाठी अधिकारी, कर्मचाऱ्यांनी दक्षता बाळगावी. ज्या गावांमध्ये विहिरी, कुपनलिका नादुरुस्त आहेत तेथे दुरुस्तीची मोहीम हाती घ्यावी. तसेच गुरांना चारा, पिण्याचे पाणी, हाताला काम या संदर्भातील कामांचे आतापासूनच नियोजन करावे, अशा सूचना त्यांनी केल्या.