नाशिक – स्थापनेपासून पक्षात सक्रिय असणाऱ्या आणि मध्यंतरी थांबून घेतलेल्या पदाधिकाऱ्यांची यादी तयार करा. कुणी नाराज असेल तर त्यांची नाराजी दूर करा, सर्वांना बरोबर घ्या, गटाध्यक्षांच्या नेमणुकीतील त्रुटी शोधा, या संदर्भातील संपूर्ण माहिती संकलित करून ती पुढील चार-पाच दिवसांत सादर करावी, असे निर्देश देत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्ष संघटनेत फेररचना करण्याचे संकेत दिले.
सोमवारी मनसेचे प्रमुख राज ठाकरे हे नाशिक दौऱ्यावर दोन दिवसांसाठी आले होते. परंतु, केवळ दोन तासात त्यांनी दौरा आवरुन नाशिक सोडले. यापूर्वी त्यांचा दौरा ऐनवेळी रद्द झाला होता. नाशिक दौऱ्यावर मुंबईतील मुसळधार पावसाचे सावट होते. परंतु, राज यांनी नाशिकला येऊन तासभर निवडक प्रमुख पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. यामध्ये डॉ. प्रदीप पवार, प्रदेश सरचिटणीस दिनकर पाटील, अतुल चांडक, सलीम शेख, रतनकुमार इचम, अंकुश पवार, महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षा सुजाता डेरे यांचा समावेश होता.
आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, मनसेने संघटनात्मक बांधणी मजबूत करण्याकडे लक्ष केंद्रीत केले आहे. मनसे मजबूत करण्यात गटबाजी अडसर ठरते. याआधी वेगवेगळ्या गटाकडून परस्परविरोधी तक्रारी झाल्या होत्या. मनसेच्या जानेवारी महिन्यातील मेळाव्यानंतर शहर आणि जिल्ह्याची नवीन कार्यकारिणी जाहीर केली जाणार असल्याचे सांगितले गेले होते. या दौऱ्यात राज यांचा मुख्य भर पक्षातील गटबाजी संपवून पक्ष संघटना मजबूत करण्यावर राहिल्याचे दिसून आले.
कधीकाळी सक्रिय असणारे, काम थांबविणारे आणि परत येण्यास इच्छुक असणाऱ्यांबद्दल विचार करा, संबंधितांच्या घरी जाऊन त्यांच्याशी चर्चा करा, जे पक्षात पुन्हा येण्यास इच्छुक आहेत, त्यांना सामावून घ्या. गटातटाच्या राजकारणात मन दुखावलेल्यांची नाराजी दूर करा. या संबंधीची माहिती याद्यांसह ३० मे रोजी सादर करावी. सर्वांना बरोबर घेऊन काम करावे, असे राज यांनी सूचित केले. पक्ष संघटनेत फेररचना करण्यासाठी आवश्यक ती माहिती त्यांनी मागविल्याचे उपस्थित पदाधिकारी सांगतात.
स्थानिक पातळीवर गटाध्यक्षांची नेमणूक केली गेली असून काही पदे रिक्त आहेत. या नेमणुकीतील त्रुटी शोधून रिक्त पदांवर कार्यकर्त्यांची नियुक्तीची सूचना त्यांनी केली. ही माहिती सादर झाल्यानंतर पुढील निर्णय घेतला जाईल, असे ते म्हणाले. पाच जून रोजी मनसेचे राजगड हे नूतनीकरण केलेले कार्यालय कार्यान्वित होत आहे. यानिमित्त पूजाविधीचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमास वा दुसऱ्या दिवशी नाशिकला येण्याचे आश्वासन त्यांनी दिले.