नाशिक :बकरी ईदनिमित्त शहर पोलीस आयुक्तालयाने २३७ समाजकंटकांना तडीपार केले आहे. यापुढेही अशी कारवाई सुरू राहणार आहे.
बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी शहर पोलीस आयुक्तालयाच्या वतीने सराईत गुन्हेगारांविरोधात तडीपारीचे आदेश देण्यात आले आहेत. यामध्ये आडगाव, म्हसरूळ, पंचवटी, भद्रकाली, सरकारवाडा, गंगापूर, मुंबईनाका, सातपूर, अंबड, इंदिरानगर, उपनगर, नाशिकरोड, देवळाली कॅम्प, चुंचाळे औद्योगिक वसाहत परिसरातील २३७ जणांचा समावेश आहे.
शहरात गोमांसची वाहतूक आणि विक्रीच्या अनुषंगाने दाखल गुन्ह्यांचे गांभीर्य लक्षात घेता शहरात कायदा व सुव्यवस्था बिघडू नये तसेच आगामी सण उत्सवाच्या काळात शांतता कायम राखण्यासाठी संबंधिताना जिल्ह्यातून १५ दिवस तडीपार करण्यात आले आहे. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात येत आहे. यापुढेही सक्रिय गुन्हेगारांवर एमपीडीए, मकोका अन्वये धडक कारवाई करण्यात येणार आहे.