जळगाव : शहरातील छत्रपती शिवाजी महाराजनगर परिसरात मंगळवारी (29 ऑगस्ट) सकाळी नऊच्या सुमारास जीर्ण तीन मजली इमारती कोसळली. इमारतीखाली दोन महिला अडकल्या होत्या. त्यातील एकीला बाहेर काढण्यात यश आले आहे. दुसर्‍या महिलेला बाहेर काढण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनीही घटनास्थळी भेट देत अधिकार्‍यांना सूचना केल्या. शहरात अनेक जीर्ण इमारती असून, पावसाळ्याच्या पार्श्‍वभूमीवर महापालिका प्रशासनाने त्या मालमत्ताधारकांना नोटिसाही बजावल्या आहेत.

मंगळवारी सकाळी छत्रपती शिवाजी महाराजनगर परिसरातील मस्जीदसमोरील जीर्ण तीन मजली इमारत सकाळी नऊच्या सुमारास कोसळली. इमारतीच्या मलब्याखाली राजश्री सुयोग पाठक (52) यांच्यासह अन्य एक 75 ते 80 वर्षीय वृद्ध महिला अडकली. मात्र, जिल्हा प्रशासनातर्फे बचावकार्य करीत राजश्री पाठक यांना बाहेर काढण्यात यश आले आहे. वृद्ध महिलेला बाहेर काढण्यासाठी बचावकार्य सुरू आहे. घटनास्थळी परिसरातील रहिवाशांनी गर्दी केली असून, शहर पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी धाव घेतली आहे. पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी घटनास्थळी दाखल झाले असून, त्यांच्याकडून सूचना करण्यात आल्या.

हेही वाचा : पीएम स्वनिधी अंतर्गत २७ हजार पथ विक्रेत्यांना कर्जवाटप

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

इमारत जीर्ण झाली असल्याने त्यात फारशा कुटुंबाचा रहिवास नसल्याने मोठी जीवितहानी टळली आहे. शहरातील जीर्ण इमारतींच्या बाबतीत महापालिका प्रशासनाने कठोर पावले न उचलल्यास भविष्यात मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता आहे. शहरात जीर्ण इमारतींची संख्या वाढली आहे. महापालिकेच्या सर्वेक्षणानुसार 2018 मध्ये शहरात 108 जीर्ण इमारती होत्या. 2019 मध्ये 114 जीर्ण इमारती होत्या. पावसाळ्याच्या पार्श्‍वभूमीवर मालमत्ताधारकांना नोटीसही बजावण्याची औपचारिकता महापालिकेने पार पाडली आहे. महापालिका घऱमालकांना महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 265 (अ) अन्वये नोटीस बजावते. मात्र, काहीच उपयोग होत नाही. 1950 मधील तरतुदीनुसार नोटीस बजावल्यानंतर होणार्‍या जीवित किंवा वित्तहानीस इमारतमालक जबाबदार असतो. त्यात दंडात्मक शिक्षेचीही तरतूद आहे.