दोन वेळा पाणीपुरवठा करण्याची तयारी पालिका प्रशासनाकडून सुरू

नाशिक : गंगापूर धरणातील जलसाठा ८० टक्क्य़ांवर पोहचल्याने शहरातील पाणी कपात मागे घेऊन पाणी पुरवठा पूर्ववत करण्याची सूचना महापौर रंजना भानसी यांनी केली. त्या अनुषंगाने दोन वेळा पाणीपुरवठा करण्याची तयारी प्रशासनाने सुरू केली आहे. काही दिवसांपूर्वी दर गुरुवारी संपूर्ण शहरातील पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय मागे घेतला गेला होता. समाधानकारक जलसाठय़ामुळे उर्वरित कपातही मागे घेण्यात येणार आहे.

पावसाने जून महिन्यात दडी मारल्याने ऐन पावसाळ्यात शहरात कपात लागू करावी लागली होती. दुष्काळी वर्षांत पालिकेने काटकसरीचे धोरण राबविले नव्हते. शहराला पाणीपुरवठा करणारे गंगापूर धरण तळ गाठण्याच्या मार्गावर असल्याने पाणी उचलण्यास अडचणी येतील, हे लक्षात घेऊन जूनच्या अखेरीस पाणी कपात लागू झाली होती. ज्या भागात दोन वेळा पाणी पुरवठा होतो, तिथे एकदाच, तर ज्या भागात एकवेळ पाणी पुरवठा होतो, तेथील पाणी पुरवठय़ात काहीअंशी कपात केली गेली. तसेच आठवडय़ातून एक कोरडा दिवस अर्थात गुरुवारी संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

पुढील काही दिवसांत त्र्यंबकेश्वर परिसरात मुसळधार पावसाला सुरुवात झाली. यामुळे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणाच्या जलसाठय़ात लक्षणीय वाढ झाली. धरण निम्म्याहून अधिक भरल्यानंतर पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या सूचनेनुसार गुरुवारीही पाणी पुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आता गंगापूर धरणात ८० टक्के जलसाठा झाल्यानंतर उर्वरित कपात मागे घेण्याची सूचना महापौर रंजना भानसी यांनी प्रशासनाला केली. या संदर्भात पालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्याशी चर्चा केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

विधानसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर, सत्ताधारी भाजप पाणी कपातीला तयार नव्हते. शहरात भाजपचे तीन आमदार आहेत. महापालिकेत भाजपची सत्ता आहे. पाणी पुरवठय़ातील विस्कळीतपणा, कपातीचा राजकीय तोटा होऊ नये, याचाही विचार झाला होता. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पाणी कपात राजकीयदृष्टय़ा परवडणारी नसल्याने सत्ताधारी भाजपने धरणात अपेक्षित जलसाठा झाल्यानंतर क्षणाचाही विलंब न करता कपात रद्द करण्याचे निर्देश दिले.

त्र्यंबकेश्वर परिसरातील पावसामुळे गंगापूरच्या जलसाठय़ात वाढ होत असून सोमवारी धरणातून यंदा पहिल्यांदा पाणी सोडण्यात आले. साडेतीन हजार क्युसेस विसर्ग करण्यात आला आहे. गंगापूरमध्ये पाणी साठल्याने शहरावरील पाणीटंचाईचे संकट दूर सारले गेले आहे. या निर्णयामुळे ज्या भागात दोन वेळा पाणीपुरवठा होतो, तिथे दोन वेळा तर जिथे एक वेळ पाणी पुरवठा होतो तिथेही पूर्ण क्षमतेने एकवेळ पाणीपुरवठा केला जाणार आहे.