सामाजिक बंधुभाव आणि सामंजस्याची जपवणूक करण्यासाठी जातीधर्माच्या पलीकडे जाऊन विचार करण्याची गरज राजकीय नेते, लोकप्रतिनिधी यांच्याकडून कायमच व्यक्त केली जाते. परंतु, उक्ती आणि कृती कायम सारखीच राहील असे नव्हे. त्याचाच अनुभव महापालिका निवडणुकीनिमित्त येत असून अनेक प्रभागांमध्ये ‘आपल्या’ समाजाची मतपेटी अधिकाधिक मजबूत कशी करता येईल याकडे उमेदवारांचे आणि त्या त्या समाजातील मान्यवरांचेही लक्ष आहे. त्यामुळेच ‘समाज एके समाज’ चा पाढा या निवडणुकीत घोकला जात आहे.
साम-दाम-दंड यासह जे जे शक्य आहेत ते सर्व उपाय करून निवडणूक जिंकणे हे ध्येय उरी बाळगून अनेक रणवीर मैदानात उतरले आहेत. निवडणुकीचा निकाल लागत नाही तोपर्यंत प्रत्येकाला आपणच विजयी होऊ, असा विश्वास वाटत असतो. निकाल लागल्यावर मात्र अनेकांना वास्तव कळून येते.गल्लीतीलही मते आपणास मिळाली नसल्याचे त्यांच्या लक्षात येते. हा धोका टाळण्यासाठी आपल्या हक्काच्या मतांवर लक्ष देणे उमेदवारांनी सुरू केले आहे. त्यासाठी आपल्या समाजातील ज्येष्ठ आणि प्रभावशील व्यक्तींना हाताशी धरून प्रचाराचे स्वरूप ठरविणे, समाजातील धुरंधरांसमवेत बैठका घेणे याचा धडाका सध्या सुरू आहे. त्यासाठी शहरातील आपल्या समाजाच्या मतदारांवर प्रभाव टाकण्यासाठी ग्रामीण भागातील समाजातील मान्यवरांचा आधार घेतला जात आहे.
अलीकडेच मराठा समाजाच्या वतीने शहरासह जिल्ह्यात काढण्यात आलेले मोर्चे आणि त्यानंतर भुजबळ समर्थक तसेच इतर समाजांकडूनही काढण्यात आलेल्या स्वतंत्र मोर्चाचा समाज म्हणून एक परिणाम नाशिकरोड परिसरातील निवडणुकीवर दिसून येत आहे. यंदाच्या निवडणुकीत चारसदस्यीय प्रभाग पद्धत असल्याने या भागात काही जणांकडून केवळ ‘आपल्या’ समाजाच्या उमेदवारास मत देण्याविषयी छुपा प्रचार केला जात आहे. जुने नाशिक, भद्रकालीच्या काही भागात मुस्लीम मतदारांची संख्या अधिक असल्याने ते ज्या उमेदवाराला साथ देतील त्याच्या विजयाची शक्यता अधिक असते. हा भाग प्रभाग क्रमांक १४ मध्ये येतो. परंतु, या ठिकाणी उमेदवारी करणारे बहुतेक उमेदवार मुस्लीमच असले तरी त्यातही वरिष्ठ-कनिष्ठ अशा भेदभावाच्या भिंती उभ्या राहिल्याचे पाहण्यात येत असून त्यानुसारच मतदानाचे गणित आखले जात आहे. या अशा आडमार्गाच्या डावपेचापासून दूर राहून निवडणुकीच्या माध्यमातून काही सामाजिक काम करता आले तर पाहावे या उद्देशाने उमेदवारी करणाऱ्यांची मात्र या समाज एके समाजच्या राजकारणामुळे अडचण झाली आहे.
प्रभाग क्र.१३ मध्ये तेली समाजाचे दोन उमेदवार
उमेदवारांना निवडणुकीवेळी समाजाची आठवण होणे साहजिक असले तरी एकाच समाजातील दोन मातब्बर रिंगणात असल्यावर समाजच कसा संभ्रमित होतो, याचे उदाहरण सध्या प्रभाग क्रमांक १३ मध्ये पाहावयास मिळत आहे. माजी महापौर अॅड. यतीन वाघ आणि गजानन शेलार हे तेली समाजाचे दोन उमेदवार एकमेकांविरुद्ध उभे ठाकल्याने कोणामागे उभे राहावे, असा प्रश्न समाजाला पडला आहे. महत्त्वाचे म्हणजे दोन्ही उमेदवारांचे बहुतेक नातेवाईक एकच आहेत. त्यामुळे नातेवाईकांचीही परीक्षा पाहणारी ही निवडणूक ठरणार आहे. एकाच्या प्रचार फेरीत दिसल्यास दुसऱ्याबरोबरचे संबंध बिघडण्याचा धोका लक्षात घेत अनेक जणांनी दोघांच्याही प्रचारात सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे. दोघांच्या उमेदवारीमुळे इतर समाजाचा तिसराच कोणी विजयी झाला तर, ही भीतीही त्यांना भेडसावत आहे.