नाशिक – त्र्यंबकेश्वरहून मंगळवारी निघणाऱ्या संत निवृत्तीनाथ महाराज आषाढी वारी पालखी सोहळ्यामुळे शहर परिसरात १२ ते १४ जून या कालावधीत काही ठिकाणी वाहतूक मार्गात बदल करण्यात आले आहेत. या पालखी सोहळ्यात अनेक दिंड्यां सहभाग राहणार आहे. १२ जून रोजी पालखीचा नाशिकमधील पंचायत समिती कार्यालय येथे सकाळचा विसावा, काझीपुरा येथील विठ्ठल मंदिरात दुपारचे जेवण, गणेशवाडी येथील आयुर्वेद रुग्णालयात रात्रीचा मुक्काम राहणार आहे.
१३ जून रोजी सकाळी नाशिकरोड येथील मुक्तीधाम येथे पालखीचे आगमन आणि दुपारच्या भोजनानंतर रात्री पळसे येथे मुक्काम. १४ जून रोजी नाशिक ग्रामीण भागात वारीचा प्रवेश होईल. या पालखी सोहळ्यात सहभागी वारकरी, दिंडी यांच्यामुळे वाहतूकीला कोणताही अडथळा होऊ नये, तसेच पालखी सोहळ्यासही वाहनांचा अडथळा होऊ नये, यासाठी पालखीच्या शहर परिसरातील वाहतूक मार्गात १२ ते १४ जून या कालावधीत बदल करण्यात आले आहेत. हे बदल शनिवारी सकाळी ११ वाजेपर्यंत राहणार आहेत.
पिंपळगाव बहुला-सातपूर-आयटीआय सिग्नल-एबीबी सिग्नल-पंचायत समिती ते मोडक सिग्नलकडे जाणारा मार्ग सर्व प्रकारच्या वाहनांना वाहतुकीसाठी बंद राहिल. मोडक सिग्नल ते अशोकस्तंभाकडे एकेरी बाजूने जाणाऱ्या मार्गावरील सर्व प्रकारच्या वाहनांना वाहतुकीस प्रवेश बंद करण्यात आला आहे. अशोकस्तंभ ते रविवार कारंजाकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना वाहतुकीस प्रवेश बंद, रविवार कारंजा ते धुमाळ पाॅइंट-गाडगे महाराज पुतळा-बादशाही कॉर्नर-महात्मा फुले मार्केट-काझीपुरा-पोलीस चौकी मार्ग वाहतुकीस बंद. काझीपुरा पोलीस चौकी-शिवाजी चौक-अमरधाम-गणेशवाडी मार्ग वाहतुकीस बंद राहील. गणेशवाडी पंचवटी ते अंमरधाम मार्गे द्वारका कडे जाणाऱ्या मार्गावरील रस्ते, दत्तमंदिर सिग्नल येथुन बिटको चौक-छत्रपती शिवाजी महाराज पुतळा- नाशिकरोडपर्यंत सर्व प्रकारच्या जड व अवजड वाहनांना प्रवेश बंद राहील. या काळात वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा अवलंब करावा, असे आवाहन वाहतूक पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे.