नाशिक : जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात महिला आयोग आपल्या दारी अंतर्गत घेण्यात आलेल्या जनसुनावणीत १०६ तक्रारी दाखल झाल्या. त्यात कौटुंबिक हिंसाचारासंदर्भातील तक्रारींचा अधिक समावेश राहिला.

या जनसुनावणीवेळी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी मार्गदर्शन केले. समाजात घडणाऱ्या हुंडाबळीच्या घटना ही सामाजिक विकृती असून या विकृतीविरूद्ध लढा देण्यासाठी सर्वांनी माणूस म्हणून एकत्र येणे गरजेचे आहे. जनसुनावणीच्या माध्यमातून पीडितांना न्याय देण्यासाठी, त्यांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी राज्य महिला आयोग सदैव कटिबद्ध त्यांनी सांगितले. प्रत्येक जिल्ह्यात महिला जनसुनावणी घेण्यात येत असून या प्रत्येक सुनावणीत जिल्हाधिकारी, पोलीस विभाग, विधी सेवा प्राधिकरण यांच्या उत्तम सहकार्यातून महिलांच्या तक्रारींची अनेक प्रकरणे निकाली काढण्यात यश आले असल्याचे अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी सांगितले.

जनसुनावणीत कौटुंबिक हिंसाचाराची प्रकरणे अधिक आढळून आली. समूपदेशनाच्या माध्यमातून अनेक कुटुंबे एकत्र आली आहेत. समाजात घडणाऱ्या हुंडाबळीच्या घटना ही सामाजिक विकृती असून या विकृतीविरूद्ध लढा देण्यासाठी सर्वांनी माणूस म्हणून एकत्र येणे गरजेचे आहे. महिला विषयक कायद्यांची माहिती महिलांना माहीत असणे आवश्यक असून महिलांनी याचा अभ्यास करून गर्भलिंग निदान, बालविवाह यासारख्या प्रवृत्तीविरूद्ध पुढे येवून लढा दिला पाहिजे. जिल्हाधिकारी आणि कामगार आयुक्त यांच्यामार्फत जिल्ह्यात ज्या ठिकाणी महिला कार्यरत असतील, अशा कामाच्या ठिकाणी लैंगिक छळ प्रतिबंधासाठी महिला तक्रार निवारण समिती स्थापन करण्याबाबत सक्तीचे आदेशित करण्यात यावे, अशा सूचना चाकणकर यांनी यावेळी दिल्या. महिलांनी कौटुंबिक हिंसाचाराबाबत तक्रार असल्यास ती कौटुंबिक संरक्षण न्यायालयाकडे द्यावी. भरोसा सेलच्या माध्यमातून कौटुंबिक तक्रार मिटवावी, यातूनही समस्याचे निराकरण न झाल्यास राज्य महिला आयोगाकडे दाद मागता येईल, असे चाकणकर यांनी नमूद केले.

यावेळी आमदार हिरामण खोसकर, महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त करिष्मा नायर, राज्य महिला आयोगाच्या उपसचिव पदमश्री बैनाडे, विभागीय उपायुक्त चंद्रशेखर पगारे, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सुनील दुसाणे, जिल्हा परिषदेच्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रतिभा संगमनेरे, पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर, पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव, जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रताप पाटील आदी उपस्थित होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पोलीस ठाण्यांमध्ये तीन समूपदेशन केंद्र

महिलांच्या समस्यांचे समाधान करण्यासाठी जिल्ह्यात पोलीस ठाण्यांच्या आवारात तीन समूपदेशन केंद्र, एक महिला आणि मुलांचे सहायता कक्ष कार्यरत आहेत. नाशिक शहरात एक वन स्टॉप सेंटर कार्यरत असून मालेगाव व येवला येथे प्रत्येकी एक वन स्टॉप सेंटर मंजूर झाले आहे. पोलीस विभागाकडे शहरी व ग्रामीण असे दोन भरोसा सेल आणि दामिनी पथक कार्यरत आहे. विवाहेच्छुक जोडप्यांसाठी विवाहपूर्व संवाद केंद्र नाशिक शहरात सुरू करण्यात आले असून, प्रशिक्षित समूपदेशक येथे नियुक्त करण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी दिली.