शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने मंगळवारी जिल्ह्यात ठिकठिकाणी झालेल्या जेल भरो आंदोलनात अनेक ठिकाणी शेतकरी वर्गाचाच दुष्काळ जाणवला. मात्र, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठय़ा जोमाने सहभागी झाले. यावेळी कार्यकर्त्यांनी ज्येष्ठ नेत्यांसोबत छायाचित्र काढण्यासाठी धडपड केल्यामुळे शहरात तर गोंधळाची स्थिती निर्माण झाली. परिणामी, द्वारका चौफुलीवर झालेल्या या आंदोलनामुळे परिसरातील सर्व रस्त्यांवरील वाहतुकीचा तासभर खोळंबा झाला. या घडामोडीत अटकसत्र सुरू झाल्यानंतर पोलीस वाहनांची अपुरी संख्या व मनुष्यबळामुळे आंदोलकांना घोषणाबाजी करण्यास अधिक कालावधी मिळाला.
राज्यात सध्या सर्वत्र दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली असतांना राज्य सरकार त्यावर ठोस उपाय योजना करण्यापेक्षा केवळ घोषणांचा पाऊस पाडत आहे. सरकारच्या कृतीचा निषेध करण्यासाठी तसेच या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे मंगळवारी जिल्ह्यात २३ ठिकाणी जेलभरो आंदोलन करण्यात आले. मुंबई-आग्रा महामार्गावर द्वारका चौफुलीत माजीमंत्री आ. छगन भुजबळांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यकर्ते बैलगाडीतून जमा झाले. बैलगाडीद्वारे कार्यकर्त्यांनी परिसराची परिक्रमा केली. त्यात नगरसेवकांपासून पदाधिकाऱ्यांना भुजबळांसोबत छायाचित्र काढायचे होते. यामुळे कार्यकर्त्यांची धक्काबुक्की, रेटारेटी सुरू झाल्यावर गोंधळाची स्थिती निर्माण झाली. भुजबळ यांनी राज्य सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांवर कडाडून टीका केली. राज्यात दुष्काळाची भयावह स्थिती आहे. मात्र सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नावर उदासीन असून त्याचा फटका शेतकरी शेतमजूर व सर्वसामान्यांना बसत असल्याचे त्यांनी नमूद केले.
मराठवाडय़ाप्रमाणे उत्तर महाराष्ट्रात दुष्काळग्रस्त भागात सरकारने ठोस उपाय करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी भुजबळ यांनी केली. १५ वर्षे आधीच्या सरकारने काय केले असे सांगत जनतेची दिशाभूल करण्यापेक्षा भाजप-सेना शासनाने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी ठोस निर्णय घ्यावेत, असा टोलाही त्यांनी लगावला. यावेळी कार्यकर्त्यांनी सरकारच्या निषेधार्थ प्रतिकात्मक प्रेत यात्रा काढली. आंदोलनानंतर भुजबळ यांच्यासह कार्यकर्त्यांना भद्रकाली, गंगापूर पोलीस ठाण्यात नेण्यात आले. यावेळी पोलिसांकडे कार्यकर्त्यांना अटक करण्यासाठी पुरेसे वाहने तसेच मनुष्यबळ नसल्याने त्यांच्यावर नामुष्की ओढावली. या गदारोळात सर्वत्र वाहतूक कोंडी झाली. या आंदोलनात नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांची संख्या मोठी होती. तुलनेत शेतकऱ्यांची संख्या कमी असल्याचे पहावयास मिळाले.
दरम्यान, ग्रामीण भागात ठिकठिकाणी आंदोलन करण्यात आले. नांदगाव येथे आ. पंकज भुजबळ, दिंडोरी येथे आ. नरहरी झिरवाळ, सटाणा येथे आ. दिपीका चव्हाण तसेच राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अॅड. रवींद्र पगार यांना अटक करण्यात आली. जिल्ह्यात २३ ठिकाणी आंदोलन झाले.
येवला येथील विंचूर चौफुली, नांदगाव येथे जुने तहसील कार्यालयासमोर, निफाड चौफुली, नाशिक- पुणे महामार्गावर शिंदे गाव, त्र्यंबकेश्वर येथे त्र्यंबक व हरसुल, इगतपुरी पंचायत समिती कार्यालय, सिन्नर बस स्थानकासमोर, कळवण बस स्थानकासमोर आदी ठिकाणी स्थानिक पदाधिकाऱ्यांनी आंदोलन केले.
संग्रहित लेख, दिनांक 16th Sep 2015 रोजी प्रकाशित
राष्ट्रवादीच्या आंदोलनात शेतकऱ्यांचा ‘दुष्काळ’
शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने मंगळवारी जिल्ह्यात ठिकठिकाणी झालेल्या
Written by रोहित धामणस्कर
Updated:

First published on: 16-09-2015 at 09:54 IST
Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ncp protest in nashik