नाशिक – पारंपरिक उद्योगासाठी जे शहर प्रसिद्ध आहे. त्या शहरांमध्ये आवश्यक त्या पायाभूत सुविधा निर्माण करून त्या उद्योगास चालना देण्याचा प्रयत्न आहे. याच माध्यमातून येवल्यात पैठणी उद्योगाला चालना देण्यासाठी विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहे. या पैठणी उद्योगाच्या माध्यमातून स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून देण्यास शासन कटिबद्ध आहे. पैठणीला जगातील सर्वोत्तम वस्त्र म्हणून ओळख मिळण्यासाठी तिला युनेस्कोमध्ये पोहचविणार असल्याचे राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले.
प्रसार भारती आणि वस्त्रोद्योग विभागाच्या वतीने तयार करण्यात आलेल्या पैठणी ‘करघा पैठणी द क्वीन ऑफ सारीज’ या चित्रपटाचे येवला येथील लक्ष्मी मल्टिप्लेक्समध्ये मंत्री भुजबळ यांच्या उपस्थितीत विशेष सादरीकरण झाले. या कार्यक्रमात ते बोलत होते.
येवला शहरात अतिशय पूर्वीपासून पैठणी बनवली जाते. सन २००४ साली आपण या मतदारसंघाचे नेतृत्व केले. त्यानंतर येथील पायाभूत सुविधा उपलब्ध झाल्या. या ठिकाणी पैठणी क्लस्टर आपण निर्माण केले. त्यामुळे येवला शहराला एक नवीन ओळख निर्माण झाली. पूर्वी केवळ चार ते पाच दुकाने होती आज ५५० हून अधिक दुकाने आहे. तसेच पाच हजाराहून अधिक हातमाग विणकर बांधव या परिसरात आहे. या उद्योगाला चालना देण्यासाठी १२.५० कोटी रुपये खर्च करून पैठणी पर्यटन केंद्र विकसित करण्यात येत आहे. तसेच रेशीम पार्क देखील उभारण्यात येत आहे. आपण एवढ्यावर थांबणार नाही तर, युनेस्कोमध्ये आपण पैठणीला घेऊन जाणार असून जगातील सर्वोत्तम वस्त्र म्हणून नावलौकिक मिळवून देण्यासाठी आले प्रयत्न आहे. तसेच पैठणीच्या प्रचार प्रसारासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या जातील, असे त्यांनी सांगितले.
यावेळी माजी नगराध्यक्ष हुसेन शेख, बंडू क्षीरसागर, निर्माते भास्कर विश्वनाथन, नायिका उपश्री, सह दिग्दर्शक सम्राट कपूर, श्री.साळुंखे, राज्य वस्त्र उद्योग धोरण समितीचे सदस्य मनोज दिवटे, शहराध्यक्ष दिपक लोणारी, पप्पू सस्कर यांच्यासह पदाधिकारी व विणकर बांधव उपस्थित होते.
युनेस्कोची यादी काय आहे ?
युनेस्कोने २०२२ मध्ये देशातील ५० खास आणि प्रतिष्ठित वारसा कापड हस्तकलांची यादी जाहीर केली. तामिळनाडूतील तोडा भरतकाम, सुंगडी, हैदराबादमधील हिमरू विणकाम आणि ओडिशातील संबलपूर येथील बंधा टाय आणि डाई विणकाम हे काही कापड होते, पैठणी मात्र सध्या युनेस्कोने मान्यता दिलेल्या कापडाच्या यादीत नसल्याचे सांगितले जाते. जरी ती महाराष्ट्रातील एक समृद्ध, प्राचीन आणि अत्यंत मौल्यवान भारतीय कापड कला आहे, मोर आणि कमळाच्या वैशिष्ठ्यपूर्ण नक्षीकामाच्या उत्कृष्ट कारागिरीसाठी पैठणी ओळखली जाते. काही वर्षापूर्वी राज्यातील जामदानी विणकाम परंपरेला युनेस्कोने संरक्षित सांस्कृतिक वारसा म्हणून मान्यता दिली आहे.