मनमाड – प्रत्यक्ष छायाचित्राशिवाय (लाईव्ह फोटो) कोणत्याही दाखल्याचा अर्ज, कागदपत्रे प्रणालीत अपलोड करू नये, अशी सूचना प्रांताधिकारी कार्यालयांनी आपले सरकार सेवा केंद्रांना दिल्यामुळे केंद्र चालकांसह दाखले मिळविण्यासाठी धडपडणाऱ्या विद्यार्थ्यांसह पालकांची अडचण व गैरसोय होत आहे. दाखल्यांसाठी प्रत्यक्ष छायाचित्र आवश्यक असून त्याशिवाय सादर केलेले दाखले, अर्ज ,ग्राह्य धरले जाणार नसल्याचे यंत्रणेकडून सुचित करण्यात आले आहे. आपले सरकार सेवा केंद्रामुळे नागरिकांची विविध कामे सोपी झाली. मात्र आता विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी विविध दाखल्याची गरज असतांना शासनाने प्रत्यक्ष छायाचित्र असल्याशिवाय दाखले मिळणार नसल्याची नवीन अट घातल्याने विविध दाखले मिळण्यास अधिक विलंब होणार असल्याची तक्रार होत आहे. याबद्दल विद्यार्थ्यांसह नागरिकांमध्ये नाराजी आहे.
सरकारच्या आपले सरकार सेवा केंद्रामुळे नागरिकांना दाखल्यांसाठी शहराच्या ठिकाणी जाण्याची गरज राहिली नाही. हा उपक्रम सर्वसामान्यांसाठी चांगला असला तरी शासन त्यात नवनवीन अटी घालून अधिक अडचणी ठरतील, अशा सूचना करीत असल्याने सेवा केंद्रचालक त्रस्तावले आहेत. त्यांना ग्राहकांच्या रोषाला तोंड द्यावे लागत आहे, नागरिकांनी शासनाच्या नवीन अटीमुळे दाखले मिळण्यास वेळ वाया जाणार असल्याचे म्हटले आहे. शैक्षणिक प्रवेश व अन्य कामांसाठी दाखले वेळेत मिळणे आवश्यक असते. त्यास विलंब होणे नुकसानीचे ठरते. सर्व आपले सरकार सेवा केंद्र संचालकांनी प्रत्यक्ष छायाचित्राशिवाय कोणताही दाखला, अर्ज प्रणालीमध्ये अपलोड करू नये, प्रत्यक्ष छायाचित्र आवश्यक असून,त्याशिवाय सादर केलेले दाखले ग्राह्य धरले जाणार नाहीत. सर्व संबंधित केंद्र चालकांनी ही सूचना काटेकोरपणे पाळावी, अशी शासनाची सूचना असल्याचे प्रांत कार्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.
दरम्यान, विद्यार्थ्यांना वेळेत दाखले न मिळाल्यास त्यांना खुल्या गटातून प्रवेश घ्यावे लागतील. यात असंख्य विद्यार्थ्यांचे नुकसान होणार आहे. तसेच ही सूचना सर्व आपले सरकार चालकांना आधीच कळवायला पाहिजे होती, म्हणजे त्यांची गैरसोय झाली नसती. विद्यार्थ्यांच्या अडी अडचणी समजू शकतो. मात्र याबाबत शासनाचा निर्णय असल्याने आम्ही त्यात काही बदल करू शकत नाही, अशी माहिती तहसीलदार सुनील सौंदाणे यांनी दिली.