धुळे : पावसाळी वातावरण आणि येथील धावपट्टीवर पाणी साचल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान धुळ्याऐवजी जळगाव येथील विमानतळावर उतरवून मुख्यमंत्र्यांना त्यांच्या वाहनातून धुळ्याकडे निघणे भाग पडले. तोपर्यंत धुळे येथे शासन आपल्या दारी कार्यक्रमासाठी उपस्थित झालेल्यांनी घरची वाट धरु नये यासाठी शासन आणि प्रशासनास वेगवेगळे उपाय योजावे लागले. उपस्थित सर्वच नेत्यांच्या भाषणांचा रतीब सुरु झाला. तोही संपत आल्याने आदिवासी नृत्य, बँड पथक यांचा आधार घ्यावा लागला.

शासन आपल्या दारी कार्यक्रमाचे सोमवारी येथे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाची वेळ दुपारी एक वाजेची ठरविण्यात आली होती. परंतु, धावपट्टीवर पाणी साचल्याने मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पवार यांचे विमान धुळे येथे उतरु शकणार नसल्याने ते जळगावकडे वळविण्यात आले. जळगावहून मग त्यांच्या वाहनाच्या ताफ्याने धुळ्याकडे कूच केले. कार्यक्रमास उशीर होऊ लागल्याने सकाळी आठपासून आलेल्या कार्यकर्त्यांची चुळबूळ वाढू लागली. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री येईपर्यंत उपस्थितांना थोपवून ठेवण्यासाठी मंत्र्यांनी, आमदारांनी खिंड लढविण्यास सुरुवात केली.

हेही वाचा >>> नाशिक : सह्याद्री फार्म्सचे विलास शिंदे यांना सी. डी. मायी कृषितज्ज्ञ पुरस्कार

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पालकमंत्री गिरीश महाजन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्यातील शिंदे-फडणवीस-पवार सरकारवर स्तुतीसुमने उधळत आपले अध्यक्षीय भाषण संपविले. त्यानंतर मंगेश चव्हाण, जयकुमार रावल या आमदारांसह मंत्री दादा भुसे यांचेही भाषण झाले. जिल्हाधिकारी जलज शर्मा, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अश्विनी पवार सर्व परिस्थितीवर लक्ष ठेवून होते. सकाळी ११ वाजता आदिवासी नृत्य झाले असतानाही दुपारी तीन वाजता पुन्हा त्यांचे नृत्य सादर करण्यात आल्याने अखेर सूत्रसंचालकाने त्यांना आता आराम द्या, असे म्हणत पोलीस बँड पथकाला बोलावून सावरकरांच्या आठवणी जागे करणारे जयोस्तूते गीताची धून वाजवली. तीही तांत्रिक कारणाने बंद करावी लागल्याने उपस्थितांचा प्रचंड हिरमोड झाला. दरम्यान, काही वेळ पाऊसही झाल्याने कार्यक्रमस्थळी धांदल उडाली. उपस्थितांच्या नजरा मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याकडे लागलेल्या आहेत. दुपारी सव्वाचारपर्यंत त्यांचे आगमन झाले नव्हते.