जळगाव: हवामानावर आधारित फळ पीकविमा अर्थात केळी पीकविम्याचा प्रश्न आता चांगलाच पेटला आहे. केळी उत्पादकांना पीकविम्याच्या रकमेसाठी शिवसेना ठाकरे गट आक्रमक झाला असून, पीकविमा कार्यालयात बुधवारी धडक देत तोडफोड केली. यावेळी पदाधिकार्यांनी प्रतिनिधींना जाब विचारला. चार फेब्रुवारीला जिल्ह्यात येणार्या मुख्यमंत्र्यांचा रस्ता अडवण्याची तयारी ठाकरे गटाने केली आहे.
केळी पीकविम्यासाठी जिल्हाभरातील शेतकरी आक्रमक झाले असून, शेतकरी संघटनांपाठोपाठ आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षही केळी उत्पादकांना पीकविम्याच्या रकमेसाठी रस्त्यावर उतरला आहे. बुधवारी दुपारी शहरातील शिव कॉलनी परिसरातील अॅग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनी ऑफ इंडिया लिमिटेच्या कार्यालयात ठाकरे गटाचे जिल्हा उपप्रमुख प्रा. भाऊसाहेब सोनवणे यांच्या नेतृत्वात केळी उत्पादकांनी धडक दिली. यावेळी कार्यालयात साहित्यांची तोडफोड करण्यात आली. प्रा. सोनवणे यांनी कंपनीच्या उपस्थित प्रतिनिधींना जिल्ह्यातील तिन्ही मंत्र्यांचा दबाव आहे का, असा संताप व्यक्त केला. आंदोलनात विजय लाड, अविनाश पाटील, सचिन चौधरी, प्रभाकर कोळी, लीलाधर सोनवणे, अनिल कोळी, चंद्रभान पवार आदींसह केळी उत्पादक सहभागी होते.
हेही वाचा >>>पुणे बसला नंदुरबार जिल्ह्यात भयंकर अपघात
प्रा. सोनवणे यांनी, ममुराबाद येथे शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या अनावरणासाठी येणाऱ्या मुख्यमंत्र्यांचे स्वागत आहे. मात्र, शिवरायांनी शेतकर्यांना जनतेचा पोशिंदा संबोधले होते. परंतु, या महाराष्ट्र सरकारने शेतकर्यांना मरणाच्या दारावर नेऊन सोडले असल्याची टीका केली. शेतकरी आपल्या कष्टाच्या घामाने शेतात धान्य उगवतो. केळी पीकविम्यासाठी हेक्टरी १० हजार ५०० रुपये याप्रमाणे पीकविमा कंपनीला ३१ ऑक्टोबर २०२२ रोजी भरले. दरवर्षीप्रमाणे १५ सप्टेंबर २०२३ रोजी पीकविम्यापोटीची रक्कम शेतकर्यांच्या बँक खात्यात वर्ग होणे क्रमप्राप्त होते. मात्र, अजूनही ती वर्ग झाली नाही. तसेच जिल्हा प्रशासनाकडून पाच जानेवारीला शेतकरी, विमान कंपनी अधिकारी, कृषी अधिकार्यांसोबत झालेल्या बैठकीत शेतकर्यांच्या खात्यात पीकविम्याची रक्कम वर्ग करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. तेही झाले नाही. जिल्हाधिकार्यांसह विमा कंपनी, कृषी विभागाच्या अधिकार्यांनी सर्व कामे सोडून केळी पीकविम्यापोटीची रक्कम शेतकर्यांच्या बँक खात्यात वर्ग करावी; अन्यथा मुख्यमंत्र्यांच्या वाहनांचा ताफा अडविण्याचा इशारा सोनवणे यांनी दिला.