धुळे – श्रीखंड खरेदी करणार्‍या ग्राहकाकडून आठ रुपये अधिक घेणे संबंधित दुकानदारास महागात पडले. आठ टक्के व्याजासह ही रक्कम परत करतांना ’त्या’ ग्राहकासाठी दुकानदाराला आपल्या गल्ल्यातून तब्बल १५ हजार रुपये सन्मानपूर्वक द्यावे लागणार आहेत. धुळे जिल्हा ग्राहक आयोगाच्या अध्यक्षा निता देसाई आणि सदस्या ॲड. रसिका निकुंभ यांनी हा निकाल दिला. निश्चित दरापेक्षा अधिक दराने वस्तु विकणार्‍या किंवा अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब करणार्‍या व्यावसायिकांवर कारवाई करावी, अशी मागणी ग्राहक संरक्षण विभागाचे जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा संयोजक ॲड.चंद्रकांत येशीराव यांच्यासह शिष्टमंडळाने निवेदनातून जिल्हाधिकार्‍यांकडे केली आहे. यासंदर्भात दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, धुळे जिल्ह्यामध्ये अनेक व्यावसायिक निश्चित किंमतीपेक्षा जास्त दराने वस्तू विकून अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब करत आहेत. ग्राहकांना सदोष सेवा देत आहेत. ग्राहकांची फसवणूक व आर्थिक पिळवणूक करीत आहेत.

व्यावसायिकांच्या अशा अनुचित प्रथेला प्रतिबंध करण्यासाठी प्रचलित कायदे व त्यातील तरतुदी लागु आहेत.यासाठी खास वैधमापन शास्त्र विभागही कार्यरत आहे. तरीही ग्राहकांची फसवणूक व आर्थिक पिळवणूक सुरुच आहे. यामुळे अशा बेकायदेशीर प्रकरणांना कायद्याने प्रतिबंध करणे गरजेचे झाले आहे. २९ एप्रिल २०२५ रोजी जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाने अशाच एका प्रकरणात दिलेला निकाल म्हणजे जिल्ह्यात काही ठिकाणी ग्राहकांची फसवणूक केली जाते यांस पुष्टी देणारा आहे.

या प्रकरणात कैलास भदाणे या ग्राहकाने दिघावे (ता. साक्री, धुळे) येथील आशापुरी इलेक्ट्रॉनिक्स ॲण्ड कोल्ड्रिंक्सचे चालक-मालक हेमंत भामरे यांच्याकडून २० ग्रॅम वजनाचे अमूल कंपनीचे श्रीखंड विकत घेतले. श्रीखंडच्या पाकिटावर एमआरपी ५२ रुपये (किंमत) असताना दुकानदाराने भदाणे यांच्याकडून ६० रुपये वसूल केले. दुकानदाराने मूळ किंमतीपेक्षा आठ रुपये अधिक घेतल्याने भदाणे यांनी दुकानदाराला विचारणा केली असता कुलिंग चार्जेस म्हणून वाढीव पैसे घेतले, असे उत्तर दुकानदार भामरे यांनी दिले. यानंतर भदाणे यांनी भामरे यांच्याकडे पक्के देयक (पावती) मागितली असता तेही भामरे यांनी दिले नाही.

दरम्यान, भदाणे यांनी ऑनलाइन ६० रुपये दुकानदाराला दिल्यावर भाजप ग्राहक संरक्षण विभागाचे जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा संयोजक ॲड.चंद्रकांत येशीराव यांच्याशी संपर्क साधला. येशीराव यांनी केलेल्या मार्गदर्शन व सूचनेनुसार जास्तीचे पैसे घेणार्‍या दुकानदाराविरुद्ध तक्रार केली. आणि संबंधित दुकानदारास नोटीस पाठवण्यात आली. संबंधित दुकानदाराने या नोटिशीला प्रतिसाद न दिल्याने ॲड. येशीराव यांच्यामार्फत ग्राहक तक्रार निवारण आयोगाकडे तक्रार दाखल करण्यात आली. या तक्रारीवर युक्तिवाद ऐकल्यावर आयोगाच्या अध्यक्षा निता देसाई आणि सदस्या ॲड. रसिका निकुंभ यांनी निकाल दिला.

 या निकालपत्रात म्हटले आहे,की दुकानदाराने ग्राहकाकडून जास्तीचे घेतलेले आठ रुपये आठ टक्के व्याजासह परत करावेत व तक्रारदारांना झालेल्या मानसिक व शारीरिक त्रासापोटी १० हजार रुपये द्यावेत, तक्रार अर्जाच्या खर्चापोटी पाच हजार रुपये असे एकूण १५ हजार रुपये दुकानदाराने संबंधित तक्रारदार ग्राहकास द्यावेत, असा निकाल देण्यात आला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या पार्श्वभूमीवर ग्राहकांना फसविणार्‍या अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब करून सदोष सेवा देणार्‍या दुकानदारावर कायद्यानुसार  कारवाई करण्यात यावी, वैधमापन शास्त्र विभागामार्फत सर्व व्यावसायिकांना समज देऊन एमआरपी बाबतचा फलक दुकानात लावण्यास बंधनकारक करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.