जळगाव : पाकिस्तानवरील हवाई हल्ल्यानंतर सैन्य दलातील रजेवर गेलेल्या सर्व निमलष्करी जवानांच्या सुट्या रद्द करण्यात आल्याने  त्यांना तातडीने मुख्यालय गाठण्याच्या सूचना देण्यात आल्या. त्यानुसार, जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील खेडगाव नंदीचे येथील मनोज पाटील हे अद्याप लग्नाची हळद फिटली नसतानाही देशसेवेसाठी गुरूवारी रवाना झाले.

मनोज पाटील २०१७ पासून सैन्य दलात कार्यरत आहेत. नाचणखेडे (ता.पाचोरा) येथील रामचंद्र पाटील यांची कन्या यामिनी हिच्याशी विवाह जुळल्याने ते काही दिवसांसाठी गावी सुटीवर आले होते. पाच मे रोजी त्यांचा विवाह पाचोरा येथे मोठ्या थाटामाटात पार पडला. मात्र, सीमेवर युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्याने त्यांना तातडीने कर्तव्यावर हजर राहण्याचे आदेश लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी प्राप्त झाले. त्यानुसार, जवान पाटील यांनी कर्तव्याला प्राधान्य देत गुरूवारी तातडीने सीमेवर रवाना होण्याचा निर्णय घेतला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कुटुंबाबरोबर लग्नाचा आनंद साजरा करत असताना, मुलाने देशसेवेला प्राधान्य दिले. त्यामुळे मला त्याचा अभिमान असल्याचे जवान मनोज यांचे वडील ज्ञानेश्वर पाटील यांनी सांगितले. देशापेक्षा मोठे काहीही नसल्याची भावना जवान मनोज यांची नववधू यामिनी हिने व्यक्त केली. दरम्यान, जवान मनोज पाटील गुरूवारी कर्तव्यावर निघाले असताना, त्यांना निरोप देण्यासाठी पाचोरा रेल्वे स्थानकावर नववधू यामिनीसह  आई, वडील, भाऊ व इतर आप्तेष्ट आले होते.