अनिकेत साठे

नाशिक: जंगलात आणि शेत शिवारात नैसर्गिकरित्या फुलणाऱ्या रान पालेभाज्या, फळभाज्या, कंद, शेंगा यात शरीरास आवश्यक औषधी व पौष्टीक घटक विपूल प्रमाणात असतात. अशा आरोग्यवर्धक रानभाज्यांचा आस्वाद घेण्याची नाशिककरांना उपलब्ध झालेली संधी पालकमंत्री दादा भुसे यांच्या व्यस्त दिनक्रमामुळे लांबणीवर पडली आहे.

रानभाज्यांचे आहारातील महत्व आणि दैनंदिन आहारात त्यांचा समावेश व्हावा, यासाठी कृषी विभाग आणि कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) यांच्यावतीने ११ आणि १२ ऑगस्ट या दिवशी रानभाज्या महोत्सवाचे आयोजन जाहीर झाले होते. परंतु, त्या दिवशी पालकमंत्री भुसे हे बहुधा शहरात नसल्याने वा कार्यबाहुल्यामुळे जेव्हा त्यांचा नाशिक दौरा आहे, त्या काळात म्हणजे १४ आणि १५ ऑगस्ट या दिवशी आता रानभाज्या महोत्सव होणार आहे. तारखेत ऐनवेळी बदल झाल्यामुळे रानभाज्या घेऊन येणारे आदिवासी शेतकरीच नव्हे तर, आयोजकांना फेरनियोजनाची कसरत करावी लागणार आहे.

हेही वाचा >>>केंद्राविरोधात आंदोलनांचा दिवस, मणिपूर हिंसाचार निषेधार्थ कामगारांच्या मागण्यांसाठी विविध संघटना रस्त्यावर

जंगल परिसरातील रानभाज्या, फळभाज्या, कंद शहरी भागात अपवादाने उपलब्ध होतात. त्यांचा हंगाम पावसाळ्याच्या सुरवातीपासून ऑक्टोबरपर्यंत चालतो. यात करवंदे, गुळवेल, कडूकंद, चाईचा मोहर आणि सुरण, तांदुळजा, काठेमाठ, कुडा, टाकळा, कोरला, कुर्डू, घोळ, अळू, खुरसणी, तोडली व लोथ आदींचा समावेश आहे. रानभाज्यांची उगवण नैसर्गिकरित्या होत असल्याने त्यावर रासायनिक किटकनाशके, बुरशीनाशके फवारली जात नाही. त्यांचे महत्व सर्वसामान्यापर्यंत पोहोचविण्यासाठी अशा महोत्सवाची व्याप्ती वाढविणे काळाची गरज असल्याकडे संयोजकांनी लक्ष वेधले. महोत्सवामुळे रानभाज्यांना चांगली बाजारपेठ मिळेल, शेतकऱ्यांना अशा भाज्यांचे योग्य भाव मिळतील आणि शहरी ग्राहकांना रानभाज्यांची ओळख होईल, या दृष्टीकोनातून रानभाजी महोत्सवाचे आयोजन करण्यात आल्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे व आत्माचे प्रकल्प संचालक राजेंद्र निकम यांनी म्हटले आहे.

हेही वाचा >>>आईवडिलांचा सांभाळ न करणारे दाखले, योजनांपासून बेदखल – जानोरी ग्रामसभेचा निर्णय

शासकीय यंत्रणेने जिल्ह्यात ११ व १२ ऑगस्ट या कालावधीत उंटवाडी रस्त्यावरील संभाजी चौकातील प्रादेशिक कृषी विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्था (रामेती) येथे रानभाजी महोत्सवाचे आयोजन करण्यात आल्याचे म्हटले होते. नागरिकांनी महोत्सवास भेट देऊन आरोग्यवर्धक रानभाज्या खरेदी कराव्यात, असे आवाहन कृषी विभाग व आत्माकडून करण्यात आले. परंतु, राज्यभाज्या खरेदीचा योग आता तीन दिवस लांबणीवर पडला आहे. महोत्सवाच्या तारखेत बदल होण्याचा संबंध पालकमंत्री दादा भुसे यांच्या दौऱ्याशी जोडला जात आहे. दरम्यान, यासंदर्भात पालकमंत्री भुसे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता ते उपलब्ध होऊ शकले नाहीत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पूर्वसंमती न घेणाऱ्या यंत्रणा अडचणीत

महोत्सवाची तयारी प्रगतीपथावर असताना यंत्रणेला तारखेत बदल करण्यास सांगण्यात आल्याची चर्चा आहे. संयोजकांनी आधी जे दोन दिवस निश्चित केले, त्या दिवशी पालकमंत्री भुसे यांना महोत्सवात सहभागी होता येणार नव्हते. त्यामुळे जेव्हा त्यांचा नाशिक दौरा असेल, त्याचवेळी महोत्सवाचे आयोजन करण्यास सांगण्यात आले. त्या अनुुषंगाने तारखेत बदल होऊन त्या १४ व १५ ऑगस्ट निश्चित झाल्याचे सांगितले जाते. रानभाज्या महोत्सव शासकीय यंत्रणेच्या दृष्टीने फारसा मोठा कार्यक्रम नव्हता. त्यामुळे त्यांनी पालकमंत्र्यांची पूर्वसंमती घेतली नव्हती. जेव्हा हा विषय समोर आला, तेव्हा संबंधित यंत्रणांना तोंडघशी पडावे लागले. त्यास संबंधित विभागातील अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला.