नाशिक : शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर राजकीय मंडळींकडून काहीही दावे केले जात असले तरी दुभंगलेल्या दोन गटात खरी शिवसेना कोणाची, हे आगामी निवडणुकांमध्ये जनताच ठरविणार, असे मत माजीमंत्री छगन भुजबळ यांनी मांडले. ठाकरे गटात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासमवेत काम केलेले अनेक ज्येष्ठ शिवसैनिक आहेत. उध्दव ठाकरे त्यांच्यासोबत चर्चा करून गळती रोखण्यासाठी योग्य तो निर्णय घेतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शिवसेना दुभंगल्यानंतर शिंदे आणि ठाकरे गटाकडून स्वतंत्रपणे शिवसेनेचा वर्धापन दिन साजरा केला जात आहे. अनेक वर्ष शिवसेनेत कार्यरत राहिलेल्या भुजबळांनी शिवसैनिकांना शुभेच्छा देतानाच प्रदीर्घ काळ अभेद्य राहिलेल्या शिवसेनेच्या सध्याच्या स्थितीबद्दल वाईट वाटत असल्याची भावना व्यक्त केली. निवडणूक आयोगाने पक्षाचे नाव आणि चिन्ह शिंदे गटाला दिले आहे. राजकीय पातळीवरून आपलीच खरी शिवसेना असे दावे होतात. तथापि, याचा निर्णय जनतेच्या न्यायालयात होणार असल्याचे त्यांनी सूचित केले. लोक घरी बसून सर्व काही ठरवतात. कोण बरोबर, कोण चुकीचे हे निश्चित करतात. पुढील सर्व निवडणुकीत जनताच खरी शिवसेना कोणाची हे ठरवणार असल्याचे भुजबळ यांनी नमूद केले. हेही वाचा >>> युतीतील जागेवर दावा बोलण्याचा अधिकार शिवसेनेला दिला कोणी? भाजपच्या गोटात खळबळ; नव्या वादाला तोंड ठाकरे गटातून विधान परिषद सदस्य ॲड. मनिषा कायंदे यांनी शिंदे गटात प्रवेश केला. त्या शिंदे गटात कशा गेल्या, याबद्दल भुजबळांनी आश्चर्य व्यक्त केले. पक्षांतराचा प्रवास अजून सुरू आहे. गळती रोखण्यासाठी आपण उध्दव ठाकरेंना काही सल्ला देण्याची आवश्यकता नाही. अनेक अनुभवी शिवसैनिक आजही त्यांच्यासोबत आहेत. त्यांच्याशी चर्चा करून ते योग्य निर्णय घेऊ शकतात. मात्र ठाकरेंनी कोणाला थांबवायचे नाही असे जणू निश्चित केले आहे. त्यांचा शिवसैनिक आणि जनतेवर विश्वास आहे. खऱ्या शिवसेनेचा न्याय जनतेच्या दरबारात होणार असल्याचे त्यांचे गृहितक असल्याकडे भुजबळ यांनी लक्ष वेधले. तेव्हाची अभेद्यता आणि आजचे चित्र शिवसेनेतील आठवणींना भुजबळ यांनी उजाळा दिला. शिवसेनेच्या स्थापनेनंतर प्रारंभीची २५ वर्षे आठवतात. शाखा प्रमुख म्हणून प्रथम जबाबदारी मिळाली होती. वर्धापन दिनी माझगाव, चेंबुर व आसपासच्या सर्व भागातून आम्ही शिवसैनिक मालमोटारीने दादरला जायचो. १९७३ मध्ये नगरसेवक झालो. १९७८ मध्ये महानगरपालिकेत गटनेता म्हणून जबाबदारी मिळाली. शिवाजी पार्कवर बोलण्याची संधी मिळायची. शिवसेनेने अनेक जबाबदाऱ्या दिल्या. महापौरपद दिले. तेव्हा शिवसेनेत अभेद्य एकजूट होती. कठीण प्रसंगात शिवसैनिक उभे राहायचे. शिवसेनाप्रमुखांचा आदेश आला की प्रश्न मिटला. करा, नाहीतर मरा, या त्वेषाने शिवसैनिक कुठलाही विचार न करता कामाला लागायचे. काही कारणांनी पुढे सेनेतून बाहेर पडलो,असे नमूद करत शिवसेना फुटली हे अद्याप मनाला पटत नसल्याचे भुजबळ यांनी सांगितले.