लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

नाशिक: शहरातून जाणाऱ्या मुंबई-आग्रा महामार्गावरील उड्डाण पुलावर मंगळवारी सकाळी कंटेनरने आयशर टेम्पो वाहनाला धडक दिल्याने मायलेकींचा मृत्यू झाला. तर तीन जण जखमी झाले. नादुरुस्त टेम्पो रस्त्यावर थांबलेला होता. अपघातामुळे उड्डाण पुलावर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली.

द्वारका ते आडगाव दरम्यान उड्डाण पुलावर पंचवटी महाविद्यालयासमोर हा अपघात झाला. धडक इतकी जबरदस्त होती की, कंटेनरच्या चालक कक्षाचा चक्काचूर झाला. नादुरुस्त टेम्पोचे मागील भागाचे नुकसान झाले. उड्डाण पुलावर अकस्मात काही दोष उद्भवल्याने नादुरुस्त टेम्पो रस्त्यावर थांबलेला होता. भरधाव कंटेनर चालकाला त्याचा अंदाज आला नाही. कंटेनरने टेम्पोला मागून धडक दिली. या अपघातात नाफिसा अफजल शेख (३५) आणि त्यांची मुलगी तरन्नुम अफजल शेख (सात) यांचा जागीच मृत्यू झाला. तर अफजल शेख आणि आयेशा शेख (सहा) यांच्यासह एक अनोळखी व्यक्ती असे तीन जण जखमी झाल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. अपघातामुळे उड्डाण पुलावरील एका बाजूची वाहतूक प्रभावित झाली.

आणखी वाचा-त्र्यंबकेश्वर प्रकरणात स्थानिकांचे सामंजस्य तर, राजकारणी कुरघोडीत व्यस्त

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पंचवटी पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी धाव घेऊन जखमींना तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. मायलेकींचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोषित केले. उर्वरीत तीन जखमींवर उपचार सुरू आहेत. या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कंटेनरमधून शेख कुटुंबिय प्रवास करीत होता. ते गौळाणे येथील असल्याचे सांगितले जाते. मागील काही दिवसात उड्डाण पुलावरील अपघातात वाढ झाली आहे. या पुलावर दुचाकी वाहनांना बंदी आहे. तरीदेखील अनेक दुचाकीधारक मुक्तपणे भ्रमंती करीत असतात. अपघातात अनेक दुचाकीस्वारांना प्राण गमवावे लागले आहेत. सुमारे साडेसहा ते सात किलोमीटर अंतर असलेल्या उड्डाण पुलावर नादुरुस्त वाहने अडकून पडणार नाही, याची दक्षता घेण्याची गरज आहे. नादुरुस्त आयशर टेम्पो या अपघाताचे कारण ठरल्याचे मानले जात आहे.