लोकसत्ता प्रतिनिधी नाशिक: जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी दोन जणांचा बुडून मृत्यू झाला. याप्रकरणी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. सिन्नर तालुक्यातील अहिल्यानगर येथील विनोद आडणे (४७) हे गुळवंच शिवारातील देवनदी पात्रात आंघोळीसाठी गेले होते. तोल जावून पडल्याने ते बुडाले. त्यांना पाण्याबाहेर काढून तातडीने सिन्नर रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. दुसरी घटना चणकापूर धरणात घडली. राजेंद्र मोरे (२६, रा. दरेगाव) यांचा मृतदेह धरणाच्या पाण्यात तरंगतांना आढळला. या प्रकरणी अभोणा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. आणखी वाचा-जळगाव जिल्ह्यातून तीन गुन्हेगार हद्दपार विहिरीत महिलेचा मृतदेह देवळा तालुक्यातील सरस्वतीवाडी येथे घराजवळील शेतातील विहिरीत जयश्री भामरे (३६) या महिलेचा मृतदेह आढळला. या प्रकरणी देवळा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. जयश्री यांनी आत्महत्या केली की त्यांचा घातपात झाला, हे स्पष्ट नाही. त्या आजारपणाला कंटाळल्या असल्याचे तपासी अधिकारी यांनी सांगितले. विजेच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू चांदवड येथील नितीन सोनवणे (३५) हे शेतातील विहिरीवर मोटार चालु करण्यासाठी गेले असता विहिरीजवळ असलेल्या लोखंडी खांबाला लावलेल्या पेटीत उतरलेल्या विद्युत प्रवाहाचा त्यांना धक्का बसला. हा प्रकार लक्षात येताच अन्य नातेवाईकांनी त्यांना मनमाड येथे रुग्णालयात नेले. डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.