नाशिक – स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या मुद्यावर ठाकरे गट आणि काँग्रेसमधील वाद काहिसे शमण्याची चिन्हे दिसत असताना दुसरीकडे शिंदे गटाने शहरात ‘बघा हेच खरे गद्दार’ असा उल्लेख करीत बुधवारी खासदार संजय राऊत यांना फलकाद्वारे लक्ष्य केले आहे. राहुल गांधी वारंवार सावरकरांचा अपमान करतात, तेव्हा राऊत हे त्यांच्या गळ्यात गळे घालून फिरतात, याकडे छायाचित्राद्वारे लक्ष वेधण्यात आले. या फलकामुळे ठाकरे आणि शिंदे गटात तणावाची स्थिती निर्माण झाली. कुठलीही परवानगी नसल्याने यंत्रणेने अवघ्या काही तासांत हे फलक हटविले.

सावरकर यांच्या मुद्यावर सत्ताधारी शिवसेना-भाजपा युतीने ठाकरे गटाला कोंडीत पकडण्याचे धोरण आखले आहे. अलीकडेच मालेगाव येथे झालेल्या सभेत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना या मुद्यावर आपली भूमिका स्पष्ट करणे भाग पडले होते. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी १४ वर्षे मरणयातना सोसल्या. देशासाठी बलिदान देणाऱ्या क्रांतीकारकांइतकेच त्यांचे योगदान आहे. देशातील लोकशाही वाचविण्यासाठी एकत्रितपणे लढायचे असेल तर आमच्या दैवतांचा अपमान सहन करणार नाही, अशा शब्दांत ठाकरे यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना सुनावले होते. या मुद्यावरून महाविकास आघाडीत बिघाडीचे चिन्ह दिसताच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मध्यस्ती केली. सावरकरांचा मुद्दा बाजूला ठेवण्याची तयारी गांधी यांनी दर्शविली आहे. या घडामोडींचे पडसाद सावरकर यांच्या जन्मभूमीत उमटले. नाशिकची जबाबदारी अनेक वर्षांपासून संजय राऊत सांभाळत आहेत. त्यांच्या कार्यशैलीवर शिवसेनेने (शिंदे गट) फलकांद्वारे तोफ डागली.

हेही वाचा – अल्पवयीन मुलांनी वाहन चालविल्यास पालकांना कारावास; अपघात रोखण्यासाठी आरटीओची विशेष मोहीम

हेही वाचा – जळगाव : सप्तश्रृंग गडाकडे जाणाऱ्या दिंडीवर पाळधीत दगडफेक; तीनजण जखमी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शिवसेना युवा सेनेचे विस्तारक योगेश बेलदार, जिल्हाप्रमुख हर्षदा गायकर यांनी ‘आम्ही सारे सावरकर’ असा उल्लेख करीत मध्यवर्ती रविवार कारंजा भागात फलक लावला. सावरकरांचा जेव्हा अपमान झाला, तेव्हा बाळासाहेबांनी स्वत: रस्त्यावर उतरून निषेध केला होता, याची आठवणही छायाचित्राद्वारे करून देण्यात आली आहे. फलकामुळे बुधवारी सकाळी ठाकरे गट आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यात मतभेद झाले. ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी त्यास आक्षेप घेतला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. फलक लावणाऱ्या शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांना बोलावण्यात आले. या फलकासाठी परवानगी घेतलेली नव्हती. फलकामुळे तणावाची स्थिती निर्माण होण्याची शक्यता असल्याने पोलिसांनी ते हटविले. त्यास बेलदार यांनी दुजोरा दिला.