जळगाव – उन्हाची तीव्रता वाढताच गिरणा धरणाच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या जिल्ह्यातील गावांमध्ये टंचाईच्या झळाही तीव्र झाल्या आहेत. यामुळे गिरणा धरणातून रविवारी सायंकाळी चौथे आवर्तन सोडण्यात आले. त्याचा लाभ जिल्ह्यातील १०८ गावांना होणार आहे. आवर्तन हे पिण्याच्या पाण्यासाठीच आहे. त्यामुळे नदीकाठच्या शेतकऱ्यांनी कृषिपंप बंद ठेवावेत, असे आवाहन पाटबंधारे विभागाने केले आहे.

तीव्र उन्हाच्या झळा बसत असल्याने टंचाईग्रस्त गावांची संख्या वाढत आहे. जिल्हाधिकारी अमन मित्तल, गिरणा पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता देवेंद्र अग्रवाल यांच्या आदेशावरून रविवारी सायंकाळी सहाच्या सुमारास गिरणा धरणातून नदीपात्रात चौथे आवर्तन सोडण्यात आले असून ते थेट जळगाव तालुक्यातील कानळद्यापर्यंत पोहोचेल. त्यामुळे त्याचा चाळीसगाव, भडगाव, पाचोरा, धरणगाव, एरंडोल, जळगाव आदी तालुक्यांतील १०८ गावांना लाभ होईल. तसेच भडगाव व पाचोरा पालिका हद्दीतही या पाण्यामुळे टंचाईवर मात करता येणार आहे. रब्बी हंगामासाठी यापूर्वी तीन आवर्तने सोडण्यात आली होती. आता दोन आवर्तने पिण्यासाठी सोडण्यात येणार आहेत. त्यानुसार हे आवर्तन सोडण्यात आले. चौथ्या आवर्तनात दोन हजार क्युसेस वेगाने पाणी सोडण्यात आले आहे. तर १४०० दशलक्ष घनफूट पाणी आरक्षित असेल. जलसंपदा विभागासोबत पालकमंत्र्यांनी घेतलेल्या बैठकीत यंदा पाच आवर्तने सोडण्याचा निर्णय झाला होता. पाचवे आवर्तन जूनमध्ये सोडण्यात येणार आहे.

हेही वाचा – अकोला शहरातील इंटरनेट सेवा बंद; शहरात तणावपूर्ण शांतता; बाजारपेठ बंद, कोट्यवधींचे व्यवहार ठप्प

यापूर्वी गिरणा धरणातून शेवटचे दीड हजार क्युसेस पाण्याचे आवर्तन मार्चमध्ये सोडले होते. रविवारी चौथ्या आवर्तनानंंतर धरणात २२ टक्के जलसाठा शिल्लक राहील. पावसाळा लांबल्यास त्यातून पाचवे आवर्तन सोडले जाऊ शकते. गिरणा धरणातील पाणी आता पिण्यासाठी आरक्षित आहे. १६ डिसेंबर २०२२ रोजी पहिले आवर्तन सोडण्यात आले होते. दरम्यान, गिरणा धरणात मे २०१५ मध्ये अवघा ११ टक्के जलसाठा होता. तरीही पाटबंधारे विभागाकडून जलवाहिनीद्वारे वर्षभर पाणी पुरविण्यात आले होते. यंदा पाच आवर्तने सोडल्यानंतरही धरणात २२ टक्के जलसाठा शिल्लक राहू शकतो. त्यामुळे पावसाळा लांबला तरी पाण्याची झळ बसणार नाही.

हेही वाचा – श्री सप्तश्रृंगी देवीच्या मंदिर सभामंडप जीर्णोद्धार प्रकल्पासाठी ११ लक्ष देणगी अर्पण

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कृषिपंप बंद ठेवण्याचे आवाहन

पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होऊ नये यादृष्टीने गिरणा धरणातून चौथे आवर्तन सोडण्यात आले आहे. नदीकाठावरील लोकांनी सावध राहावे. हे आवर्तन पिण्यासाठीच असून त्याचा उपयोग शेतीसाठी करू नये. आवर्तन सोडलेल्या काळात नदीकाठचे कृषिपंप बंद ठेवावेत. पाणीपुरवठा योजनांचे पंप सुरू राहतील; अन्यथा पाणीचोरी करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल. जनतेने पाण्याचा जपून वापर करावा. – हेमंत पाटील (उपविभागीय अभियंता, पाटबंधारे उपविभाग, चाळीसगाव)