आमची आगरी जात आता टाकलीय तिनी कात काळोखावं केलीय मात जशी जलते दिवंची वात.. उठ रं पोरा, सोर तो घुरघुटला, बघ सुव्र्यानारायन आला.. भूपाळीलाही लाजवेल, अशी वाणी आमचे ‘आयव’ची. तिची ही आरोळी कानावर पडली की जाग यावी. तिनेच मायेने विणलेल्या गोधडीतून बाहेर पडू नये असे वाटत असतानाच, सूर्याच्या किरणांनी चेहऱ्यावर झडप घालावी आणि दिवसाची सुरुवात त्याच्या दर्शनाने व्हावी. कानांनी ऐकावा तो कालरव पक्ष्यांचा आणि हंबरावी कपिला. आळोखेपिळोखे देत येऊन बसावं ओटीवर आणि अलगद नजर फिरत राहावी अंगणात पडलेल्या प्राजक्ताच्या सडय़ावर. हलकेच उडावा धुळीचा धुरळा अन् बनावेत त्याचे ग्रह-तारे त्या पहाटकिरणांवर आणि त्यातूनच दिसावेत बळीराजाचे सर्जा-राजा ऐटीत निघालेले माळरानावर. रामप्रहर म्हणजे झाडांची शिंपण उरकून, कपिलेचं दूध काढून पडवीत चुल्हा पेटवून वडिलोपार्जित भल्या मोठय़ा तांब्याच्या तपेलीत आंघोळीसाठी पाणी तापवण्याचा, शेती आणि आगराच्या अवजारांची डागडुजी करण्याचा. नांगर कुदळ, मोगोर इत्यादी शेतीची अवजारे, फलटी, पेनसा, खुरपी, फोरनी, लौटान अशा अजब नावांची अवजारे. खोंडा, इरले, कोठय़ा यांचे आकारही निराळे. व्यवसायानुरूप त्यांच्या वसाहती म्हणजे त्यांची गावे शेतांच्या मध्यावर, समुद्रकिनाऱ्यालगत किंवा मिठागरांच्या बाजूला असतात. घरांची बांधणी आणि ठेवण बहुतांश गावांमध्ये सारखीच असे. कुडांच्या (कारवीच्या) भिंती, कौलारू छपरे, तर काहींची ऐपतीप्रमाणे विटा-मातीच्या भिंती. कौलेही ऐपतीप्रमाणे अन्यथा डोईवर गवताचे छत. काही हिरव्यागार शेतांनी वेढलेली, काही डोंगराच्या पायथ्याशी विसावलेली. काही समुद्राच्या लाटांच्या स्पंदनावर स्थिरावलेली, तर काही डोंगरमाथ्यावर विराजमान झालेली. गावांचा बाज मात्र एकसारखा. प्रत्येक गावात एक ग्रामदैवत. गावाच्या वेशीवर पाळत ठेवून बसलेले. संकटांचा संहारक म्हणून संपूर्ण गावाची त्याच्यावर अतीव श्रद्धा. त्याचा मानपान म्हणून गावाची जत्रा भरणारच! समुद्रकिनारी असलेली गावे नारळी-पोफळींनी, ताडा-माडांनी बहरलेली असत. डोंगराकडेची गावं आंबा-जांभळीच्या वृक्षांत विसावलेली दिसायची. प्रत्येक घरासमोर अंगण असे. आगरी समाज एकत्र कुटुंब पद्धतीवर विश्वास ठेवणारा. त्यामुळे बराच मोठा गोतावळा भल्या मोठय़ा घरात खोपरे (खोल्या) करून गुण्यागोविंदाने नांदायचा. चिल्लीपिल्ली तर घरात कमी आणि अंगणातच जास्त वेळ असायची. औद्योगिकीकरणाच्या रेटय़ात हे मूळ निवासी उद्ध्वस्त झाले. त्यांची मिठागरे, त्यांची शेती आणि त्यांची गावेही गिळंकृत केली गेली. परप्रांतीय व्यापाऱ्यांनी त्यांच्या व्यवसायावर कब्जा केला. पूर्वी आगरी गावांत अजिबात न आढळणारे परप्रांतीय आता प्रचंड प्रमाणात आले आहेत. सुंदर गावांच्या जागी सिमेंटची जंगलं उभी राहिली आहेत. आगरी लोक हे रावणाच्या दरबारी गायक-वादक होते, असे म्हणतात. त्यामुळे ते उत्तम कलाकार होते आणि आहेत. त्यांच्या या कलेवर खूश होऊन रावणाने त्यांना पश्चिम किनाऱ्यावरील जागा देऊ केली, अशी आख्यायिका आहे. राजा नहुषाचा नातू ययाती याचा वंशज बलिभद्र आणि त्याची पत्नी आगलिका यांचा पुत्र आगला. आगला हा बलिभद्र राजाच्या पश्चात मुंगी पैठण येथे राहू लागला. हे ‘आगले’ लोक १३व्या शतकात मुंगी पैठणच्या बिंबराजाच्या सैन्यात तैनात झाले. बादशहाच्या राजवटीत कोकणातील सागरगडावरील एक यवन सरदार बादशहाला डोईजड झाला. सागरगडाशेजारील हिंदू राजवटीवर ताबा मिळवून स्वतंत्र राज्यकारभार करू लागला. बादशहाने पाठवलेल्या सर्व सरदारांचा पराभव झाल्याने, त्याने बलाढय़ बिंबराजाला मदतीची विनंती केली. आगले लोकांची ताकद बिंबराजाकडे होती. तो मुंगीपैठणहून कोकणात निघाला. त्याचे सैन्य वाटेत नाशिक, घोटी, इगतपुरी, शहापूर, कल्याण येथे राहिले. कलांमध्ये निपुण असल्यामुळे त्यांनी दगडांमध्ये शिल्पे कोरली. तेच पुढे आगरी पाथरवट म्हणून ओळखले जाऊ लागले. नंतर बिंबराजाने सैन्यानिशी कोकणात येऊन अलिबाग, आवास, सासवणे आणि सागरगडावर सरदाराचा पाडाव केला. त्याला बादशहाच्या ताब्यात दिले आणि स्वत: राज्यकारभार पाहू लागला. येथील निसर्गाने बिंबराजाला भुरळ घातली आणि त्याने मुंगीपैठणला न जाता कोकणातच राहण्याचा निर्णय घेतला. प्रजेला गावठाणे वसवून दिली आणि मिठागरे बांधून दिली. मिठागरांत काम करणारे मीठ-आगरी म्हणून ओळखले जाऊ लागले. शेती-मळे पिकवू लागले, तर काही मत्स्य व्यवसाय करू लागले. अलिबाग, पेण, पनवेल, उरण, कर्जत, रोहे, जंजिरा, श्रीवर्धन, ठाणे इत्यादी ठिकाणी आगरी समाज पसरला आणि स्थिरावला. भौगोलिक रचनेनुसार समाजाचा व्यवसायही विभागला गेला. स्त्री-पुरुष समता मुंबई, ठाणे, रायगड, नाशिक इत्यादी जिल्ह्य़ांमध्ये आगरी समाजाचे वास्तव्य आहे. स्त्री-पुरुष समता किंबहुना स्त्रीप्रधान संस्कृती म्हणायला हरकत नाही. आगरी पुरुष हा धिप्पाड, बलदंड आणि त्याच्या खांद्याला खांदा लावून आगारात, शेतात, खाजणात (मच्छी पकडण्याची जागा), डोंगरात, रानावनात, चिखलात, पाण्यात तेवढय़ाच ताकदीने संसाराची दुसरी बाजू सांभाळणारी त्याची सहचारिणी. वर्षभर मासे रस्त्यांलगत लहान-मोठी तळी असत. आगरी समाज शेती आणि मिठागरांचा व्यवसाय करत असे. त्यामुळे शेतांत आणि मिठागरांतही पावसाळ्यात मोठय़ा प्रमाणात माशांची पैदास होत असे. वर्षभर मासे मिळावेत, यासाठी हे आगरी लोक या छोटय़ा तळ्यांत माशांची पैदास करत. तळ्यांच्या काठांवरून चालताना जिताडा माशाचा ‘चुबूक’ असा आवाज कानांत शिरे आणि आपसूकच तोंडाला पाणी सुटे.