दुचाकीचालकांकडून संताप

लोकसत्ता प्रतिनिधी

नवी मुंबई : ‘एमआयडीसी’तील अंतर्गत रस्त्यांची अत्यंत दुरवस्था झाली असून रस्त्यावर डांबरच शिल्लक राहिलेले नाही. मोठ-मोठे खड्डे पडले असून धुळीमुळे येथील उद्योजक, कामगार, खाद्यपदार्थ विक्रेते त्रस्त झाले आहेत. यामुळे श्वास कोंडला जात असून आरोग्याचा प्रश्न निर्माण होत असल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे. दुचाकीस्वारांना तर दुचाकी चालवणे मुश्कील झाले आहे.

एमआयडीसीमध्ये एकूण १३६ किलोमीटरचे रस्ते असून फक्त  ३० किलोमीटरचे रस्ते पूर्ण झालेले आहेत. याबाबत पालिका व एमआयडीसीत वाद सुरू असून यावर वारंवार बैठक घेत फक्त घोषणा केल्या जातात. मात्र कामे काही होत नाहीत. गेली अनेक वर्षे ‘एमआयडीसी’तील रस्त्यांचा प्रश्न प्रलंबित आहे. दरवर्षी पावसाळ्यात येथील रस्त्यांची प्रचंड दुरवस्था होते. त्याकडे पालिका व एमआयडीसी प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याने अंतर्गत रस्त्यांवर डांबरच शिल्लक राहिलेले नाही. खडी व माती सर्वत्र पसरली असल्याने वाहनचालक यामुळे त्रस्त आहेत.  यात सर्वाधिक दुरवस्था ही शीळ ते हायवा कंपनी आणि त्याच्या आसपासच्या परिसरातील रस्त्यांची झाली आहे.  एखादा ट्रक किंवा बस असे मोठे वाहन गेले तर पाच ते दहा मिनिटे पुढील काही दिसत नाही.  येथील कंपन्या, वाहने, झाडे ही धुळीने माखलेली असतात.

या परिसरात मार्केटिंगचे काम करणारे मंगेश प्रजापती यांनी याबाबत तीव्र संताप व्यक्त केला. एखाद्या कंपनीत पोहचेपर्यंत एक तर सुरक्षित पोहचू याची शाश्वती नसते. त्यात कपडे धुळीने माखलेले असतात. त्यामुळे कंपनीत गेल्यानंतर  होणारे काम होत नाही.   तर ट्रकचालक शेख युनूस यांनी एमआयडीसी परीसरात माल घेऊन जायचे म्हटले की नको वाटते. धूळ नाकातोंडात जात असते. दुचाकीचालकांची तर मोठी गैरसोय होत असल्याचे त्यांनी सांगितले. हॉटेल व्यावसायिक पंकज गुप्ता यांनी हॉटेलमधील खाद्यपदार्थ सुरक्षित ठेवणे हे कठीण होत असल्याचे सांगितले. धुळीमुळे हॉटेलमधील टेबल-खुच्र्या वारंवार स्वच्छ कराव्या लागता. यामुळे ग्राहकही नाराजी व्यक्त करतात. त्याच्या व्यवसायावरही परिणाम होता.

कंपनी आवरात लावली सर्व झाडे धुळीने माखलेली आहेत. आमचा वेल्डिंगचा व्यवसाय असल्याने तो उघडय़ावर करावे लागतो. धुळीने कर्मचाऱ्यांना आरोग्याचा प्रश्न निर्मिाण होता. वर्षांनुवर्षे येथील हीच परिस्थिती आहे.

– अजय छाछेड, उद्योजक