सातशे कर्मचारी अधिकाऱ्यांची अतिरिक्त आवश्यकता

विकास महाडिक
नवी मुंबई : झपाटय़ाने वाढणाऱ्या नागरी लोकसंख्येची लोकसेवा करण्याच्या दृष्टीने नवी मुंबई पालिकेला मंजूर आकृतिबंधानुसार सातशे कर्मचारी अधिकारी आवश्यकता असून प्रत्यक्षात ही संख्या दीड हजारांच्या घरात जात आहे. करोनाकाळात आरोग्य सेवा सक्षम करण्यासाठी डॉक्टर व इतर वैद्यकीय कर्मचाऱ्यांची भरती करण्यात आली असली तरी ही भरती तात्पुरती असून कायमस्वरूपी भरती करणे आवश्यक आहे.

पालिका क्षेत्रात एकूण आठ प्रभाग असून प्रत्येक प्रभाग अधिकारी हा कमी कर्मचारी असल्याची तक्रार करीत असून तशी पत्रे प्रशासनाला देण्यात आली आहेत. सध्या पालिकेत एकूण ३३०० कायमस्वरूपी तर सात हजार कंत्राटी कामगार आहेत.

नवी मुंबई पालिकेत मुंबई, ठाणे, कल्याण डोंबिवली या आजूबाजूच्या शहरांपेक्षा कमी कायमस्वरूपी कर्मचारी असून पालिकेने कंत्राटी कामगारांवर भर दिला आहे. समान काम समान वेतन धोरणानुसार साफसफाई कामगारांना कायम करण्यात आलेले नाही.

नवी मुंबई पालिका क्षेत्राची लोकसंख्या झपाटय़ाने वाढत असून ती पंधरा लाखांच्या घरात गेली आहे. त्यामुळे पालिकेतील प्रभाग कार्यालय तसेच इतर विभागांवरील ताण वाढला असल्याने प्रत्येक प्रभाग कार्यालयातून कमी कर्मचाऱ्यांची तक्रार प्रशासनाकडे येत आहेत. मात्र कोविडकाळ आणि राज्य शासनाची भरतीसाठी लागणारी मंजुरी पाहता पालिकेतील अनेक विभागांत कर्मचारी अधिकारी भरती झालेली नाही. राज्य शासनाने चार वर्षांपूर्वी पालिकेसाठी आकृतिबंध मंजूर केलेला आहे. त्यासाठी लागणारी सेवा शर्ती नियमावलीदेखील तीन वर्षांपूर्वी तयार करण्यात आलेली आहे. त्यानुसार पालिकेत उपायुक्त पदावर प्रतिनियुक्तीने शासकीय अधिकारी आलेले आहेत तरीही ही संख्या अपुरी असल्याने काही अधिकाऱ्यांवर एकापेक्षा जास्त विभागांची जबाबदारी आहे. आकृतिबंधात साहाय्यक आयुक्त पदांची संख्या वीस आहे, पण ही पदेदेखील भरली गेलेली नाहीत. पालिकेत अनेक वर्षे काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना किमान साहाय्यक आयुक्त पदावर बढती मिळेल अशी आशा लागून राहिलेली आहे.

चार वर्षांपूर्वी मंजूर करण्यात आलेल्या आकृतिबंधात पालिकेला ३९०० कर्मचाऱ्यांची आवश्यकता असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र आजच्या घडीस केवळ ३ हजार ३०० कर्मचारी कायमस्वरूपी असून यात ७०० कर्मचाऱ्यांची कमतरता आहे. आकृतिबंधाप्रमाणे ही संख्या कमी असून प्रत्यक्षात पालिकेसाठी आता उपायुक्त ते शिपाई या पदांवर सुमारे एक हजार ५०० कर्मचारी व अधिकाऱ्यांची आवश्यकता आहे. कमी कर्मचारी व अधिकारी संख्येमुळे पालिकेतील कर्मचारी व अधिकाऱ्यांवर कामाचा ताण वाढू लागला आहे. आरोग्य विभागात तर आणीबाणीची स्थिती निर्माण झाली होती पण करोनाकाळात करण्यात आलेल्या तातडीच्या भरतीमुळे हा ताण काही प्रमाणात कमी झाला आहे तरीही वाशी येथील सार्वजनिक रुग्णालयात सद्य:स्थितीत डॉक्टर व वैद्यकीय कर्मचाऱ्यांचा तुडवडा जाणवत आहे.

पालिकेतील कमी अधिकारी संख्येमुळे दोन आतिरिक्त व आठ उपायुक्त यांच्याकडे अनेक विभागांची जबाबदारी देण्यात आली आहे. साहाय्यक आयुक्त पदासाठी मोठी प्रतीक्षा यादी आहे. पालिकेत प्रतिनियुक्तीविरुद्ध कायमस्वरूपी अधिकाऱ्यांमधील मतभेदाचे प्रमाण वाढले आहे. काहीजण अनेक वर्षे एका विभागात तळ ठोकून बसले आहेत. ज्याचा वशिला मोठा तो अनेक वर्षे साम- दाम- दंड- भेद वापरून मनाजोगा विभागात मुक्काम करून आहे.

पदोन्नती, बदली प्रक्रिया लवकरच

पालिकेतील पदोन्नतीसाठी २२१ संर्वग आहेत. यातील ८६ संवर्गाने पदोन्नती देणे शक्य आहे. २२ संर्वगाने पदोन्नती देण्यासाठी सध्या पदोन्नती समितीच्या बैठका झालेल्या आहेत. त्यामुळे पालिकेत गेली अनेक वर्षे सेवा देणाऱ्या काही अधिकाऱ्यांना पदोन्नती देण्याबाबत पालिका आयुक्त अभिजीत बांगर अनुकूल आहेत. करोनाकाळात या कर्मचाऱ्याकडून केवळ सेवा घेण्यात धन्यता न मानता त्यांना काही तरी देणे आवश्यक असल्याची भूमिका आयुक्तांनी यापूर्वीच जाहीर केली आहे. त्यामुळे पालिकेतील काही अधिकऱ्यांना लवकरच पदोन्नती तर काही जणांची बदली होणार आहे.

सध्या ३३०० कर्मचारी, अधिकारी कायमस्वरूपी आहेत. यात आणखी सातश जणांची आवश्यकता असून करोनाकाळात आरोग्य विभागात तातडीने भरती करण्यात आल्याने ही सेवा सक्षम करण्यास हातभार लागला आहे. पदोन्नतीसाठी प्रस्ताव तयार असून लवकरच निर्णय घेणार आहे.

– दादासाहेब चाबुकस्वार, उपायुक्त, नवी मुंबई पालिका