नवी मुंबई: नवी मुंबईत पडलेल्या मुसळधार पावसाने वाशीतील कृषी उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी) परिसरातील फळ व भाजीपाला बाजाराच्या प्रवेशद्वारांवर पाणी साचले असून, नालेसफाईच्या नावाखाली उपसून ठेवलेला गाळ रस्त्यावर पसरल्याने व्यापारी आणि ग्राहकांची मोठी गैरसोय झाली.

सकाळपासून कोसळलेल्या पावसामुळे सखल भाग जलमय झाले. आधीच मर्यादित खरेदीला सामोरे जात असलेल्या बाजारात आता दुर्गंधी आणि घाणीचे साम्राज्य पसरले. शिल्लक राहिलेला आणि सडलेला माल टाकल्यामुळे रोगराईचा धोका अधिकच वाढला. माथाडी कामगार, व्यापारी आणि बाजारात येणारे ग्राहक यामधून अस्वस्थता आणि नाराजी व्यक्त केली जात आहे.

रोगराईचा धोका

गाळ रस्त्यावरील गटारांमध्ये अडकत असून, गटारातून पाण्याचा निचरा होण्यास अडथळे निर्माण होत आहेत. त्यामुळे बाजाराच्या प्रवेशद्वारावरच गाळ आणि घाणीचे पाणी तुंबून राहिले आहे. या गाळामुळे परिसरात डासांचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. यामुळे केवळ बाजारातीलच नव्हे तर परिसरातील रहिवाशांच्या आरोग्यावरही विपरीत परिणाम होण्याची भीती व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

फळ व भाजीपाला बाजाराबाहेरील गाळ महापालिकेने उचलणे गरजेचे आहे. काही गाळ उचलण्यात आला आहे, मात्र पावसामुळे उर्वरित गाळ वेळेत उचलता आला नाही. याबाबत महापालिकेने त्वरित कारवाई करावी. बाजारातील कचरा दररोज उचलण्यात येतो. कुठे त्रुटी असल्यास व्यापाऱ्यांनी निदर्शनास आणून दिल्यास तात्काळ कारवाई करण्यात येईल. – किरण घोलप, स्वच्छता अधिकारी