पनवेल – दिड महिन्यापूर्वी खारघर वसाहतीमधील कार्पोरेट पार्कच्या मैदानात महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यादरम्यान घडलेल्या दुर्घटनेत अनेकांचे बळी गेले. रविवारी याच मैदानात साडेतीन हजार भक्तांच्या उपस्थितीत उष्माघात आणि सुरक्षेचे सर्व नियम पाळून ४८ वा अश्वमेध महायज्ञानिमित्त आयोजित भूमीपूजन समारंभ राज्यपाल रमेश बैस यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी राज्यपाल रमेश बैस यांनी पर्यावरण आणि सामाजिक ऐक्याला धक्का लावणाऱ्या घटना घडत असताना अश्वमेध यज्ञाच्या माध्यमातून समृद्धी, सद्भावना आणि मांगल्याची पुनर्स्थापना होण्याला मदत होईल, असे प्रतिपादन केले.

यावेळी राज्याचे मंत्री सूधीर मुनगंटीवार, देव संस्कृती विश्व विद्यालयाचे प्र-कुलगुरू चिन्मय पंड्या, अखिल विश्व गायत्री परिवाराचे संचालक मनुभाई पटेल, उद्योजक डॉ. निरंजन हिरानंदानी, राधिका मर्चंट, तसेच इतर मान्यवर उपस्थित होते. हरिव्दार येथील शांतीकुंजमधील अखिल विश्व गायत्री परिवार या संस्थेतर्फे २३ ते २८ जानेवारी २०२४ या दरम्यान खारघर येथील याच मैदानात लाखो भक्त ४८ व्या अश्वमेध महायज्ञ सामूहिक पद्धतीने करणार आहेत. यानिमित्त रविवारी हा भूमीपूजन समारंभ आयोजित केला होता. राज्यपाल बैस यांनी अश्वमेध यज्ञ हे केवळ धार्मिक अनुष्ठान नसून या यज्ञाचे सामाजिक, सांस्कृतिक, पर्यावरणविषयक आणि आध्यात्मिक महत्त्व उपस्थितांना पटवून दिले.

हेही वाचा – नवी मुंबई : मान्सूनपूर्व वृक्ष छाटणी सपशेल धूळफेक; वृक्ष उन्मळून पडले, तीन गाड्यांचे नुकसान

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सर्व समाज एकत्र घेऊन हा यज्ञ करीत असल्याने यातून एकात्मतेची भावना वाढत असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. जागतिक हवामान बदलामुळे देशभरात सुरू असलेल्या दुष्काळ आणि पूरस्थितीमुळे पर्यावरण व विकासाचा समतोल साधण्याची आवश्यकता असल्याचे यावेळी राज्यपाल म्हणाले. विश्व कल्याणाच्या उद्देशाने अश्वमेध महायज्ञाचे आयोजन केल्याबद्दल राज्यपालांनी अखिल विश्व गायत्री परिवाराचे अभिनंदन केले.