उरण : तालुक्यातील सिडकोने उभारलेल्या उड्डाणपूलावर मागील अनेक महिन्यांपासून अंधारात असून याकडे सिडकोच्या वीज पुरवठा विभागाचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे उरण मधील प्रवासी व नागरीकांना या उड्डाणपूला वरून अपघाताचा धोका पत्करत प्रवास करावा लागत आहे. मात्र ही समस्या येथील पुलावर वीज पुरवठा करणारे रोहित्र(ट्रान्सफॉर्मर)चोरी केली जात असल्याने वीज पुरवठा खंडीत झाला असल्याचे सिडकोच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
हेही वाचा >>> नवी मुंबई : जुन्नर हापूसला अवकाळी पावसाचा फटका ; यंदा हंगामाला उशिराने सुरुवात , उत्पादन ही घटणार
नवी मुंबईतील विकासाचा भाग म्हणून उरणच्या विकासाची ही जबाबदारी सिडको कडे आहे. येथील उरण – पनवेल महामार्ग ते नवघर,बोकडवीरा ते नवीन शेवा व बोकडवीरा ते वायू विद्युत केंद्र असे तीन उड्डाणपूल सिडकोने उभारले आहेत. यातील नवघर उड्डाणपूल हा जवळपास वर्षेभर तर बोकडवीरा शेवा उड्डाणपूल दोन महिन्यांपासून व नव्याने सुरू करण्यात आलेल्या बोकडवीरा ते वायू विद्युत केंद्र या उड्डाणपूलावर काही दिवसच दिवे लागले होते. त्यांनतर हा उड्डाणपूल ही अंधारात आहे.
उरण मधील अनेक विभागांना जोडणाऱ्या रेल्वेच्या उड्डाणपूला वरून मोठ्या प्रमाणात वाहतूक होत आहे. यातील बोकडवीरा व नवघर या दोन पुलावरील खड्यामुळे अपघाताची शक्यता आहे. तर बोकडवीरा पुलावरील एका कोट गावातील नागरिकाचा अपघातात मृत्यू झाला आहे. मात्र अशा घटना घडत असतांनाही सिडकोच्या उड्डाणपूलावरील वीज पुरवठा विभागाचे सातत्याने दुर्लक्ष होत आहे.
हेही वाचा >>> उरण – खारकोपर लोकलला पंतप्रधानांची प्रतिक्षा? १५ एप्रिलनंतरही करावी लागणार प्रतिक्षा?
उड्डाणपूलावरील वीज पुरवठ्यासाठी महिना लागणार : या संदर्भात सिडकोच्या उड्डाणपूल वीज पुरवठा विभागाच्या अधिकारी नेहा डहाके यांच्याशी संपर्क साधला असता या उड्डाणपूला वरील महावितरणच्या वीज पुरवठा करणाऱ्या रोहित्र चोरी,त्यातील तेल कॉईल काढल्या जात असल्याने वीज खंडीत होत असल्याची माहीती त्यांनी दिली. यामुळे महावितरणच्या उच्च अधिकाऱ्यांशी संपर्क झाला आहे. त्यांच्याकडून येत्या महिन्याभरात या उड्डाणपूला वरील वीज पुरवठा पूर्ववत होईल अशी माहीती त्यांनी दिली.