नवी मुंबई : अमेरिकेने निर्बंध लावल्याने त्याचा फटका कुठल्या उद्योगांना बसणार आहे, त्याचा आढावा घेण्यासाठी उच्च स्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे. या समिती मार्फत टेरिफ वाढीमुळे फटका बसू शकेल अशा उद्योगांना काही पर्याय उपलब्ध करुन देता येतील का, याचा अभ्यास राज्य सरकारकडून केला जात आहे. अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
नवी मुंबईतील ऐरोली येथे मंगळवारी कॅपिटालँड डेटा सेंटरचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी संवाद साधला. अमेरिकेने निर्बंध लावले आहेत. त्याचा फटका कोणत्या उद्योगांना बसणार याबाबतचा आढावा घेण्यासाठी आम्ही बैठक घेतली होती.
या बैठकीत आढावा घेतल्यानंतर उद्योगांना कशाप्रकारे मदत करता येईल किंवा त्यांना पर्यायी बाजारपेठ मिळवून देता येईल याबाबत प्रयत्न सुरू आहे. तसेच त्यासाठी उच्च स्तरिय समिती तयार करण्यात आली आहे. ही समिती त्या क्षेत्रांचा आढावा घेऊन उद्योगांना पर्यायी बाजारपेठ कोणती आहे, त्यांना कोणत्या प्रकारची मदत करावी लागेल अशा सर्व उपाययोजना सूचविणार आहे. त्याची अंमलबजावणी केली जाईल असे फडणवीस यांनी सांगितले.
डेटा सेंटरबाबत फडणवीस यांना विचारले असता, आपण डिजीटल अर्थव्यवस्थेत आहोत. त्यामुळे प्रत्येक बाबींची कार्यक्षमता वाढविण्यासाठी डेटा सेंटरची आवश्यकता पडते. देशातील ६० टक्के डेटा सेंटरची क्षमता एकट्या महाराष्ट्रात उभी राहिली आहे असे फडणवीस म्हणाले. यावेळी करार देखील झालेला आहे. राज्य सरकारने डेटा सेंटर ऑपरेटर यांच्यासोबत २० हजार कोटी रुपयांच्या पुढील गुंतवणुकीसाठी सामंजस्य करार केला. प्रस्तावित गुंतवणुकीत नवीन डेटा सेंटर, लॉजिस्टिक सुविधा आणि इतर संबंधित क्षेत्रांचा समावेश असेल असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.
सिंगापूरमधील गुंतवणूक कंपनी टेमासेकने राज्यातील महत्त्वाच्या प्रकल्पांना पाठिंबा देण्याचे आश्वासन दिले असून, नागपूरमध्ये रुग्णालय उभारण्यासाठी ७०० कोटी रुपयांच्या सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली आहे. याशिवाय, जागतिक गुंतवणूक कंपनी मॅपलट्रीने महाराष्ट्रात लॉजिस्टिक पार्क उभारण्यासाठी तीन हजार कोटी रुपयांच्या करारावर स्वाक्षरी केली आहे, असेही त्यांनी सांगितले.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम वेगाने
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम वेगाने सुरू आहे. आपण ते नियोजित वेळेत पूर्ण करू शकू असे फडणवीस यांनी प्रकल्पाच्या संभाव्य पूर्णत्व तारखेबाबतच्या प्रश्नावर उत्तर देताना सांगितले.