पनवेल: कळंबोली येथील रोडपाली सिग्नल जवळील सोमवारी सकाळी झालेल्या अपघातामध्ये भरधाव मोटार चालविणा-या चालकाला हृदयविकाराचा झटका आल्याने हा अपघात झाल्याचे सिद्ध झाले. अपघातानंतर बेशुद्ध झालेल्या ३२ वर्षीय अनिकेत नलावडे यांना तातडीने उपचारासाठी हाकेच्या अंतरावर असणा-या व्हाईट लोटस या रुग्णालयात दाखल करण्यात आले.

तब्बल पंधरा मिनिटे अनिकेत यांचे हदय बंद असताना तातडीने दिलेल्या कार्डिओपल्मोनरी रिसुसिटेशन (सीपीआर) आणि वैद्यकीय उपचारामुळे त्यांचे प्राण वाचले. जेष्ठ हृदय तज्ञ डॉ. विजय डिसिल्व्हा आणि त्यांच्या सहका-यांनी पुढील पाऊणतासात केलेल्या यशस्वी शस्त्रक्रियेमुळे अनिकेत यांचे प्राण वाचल्याचे त्यांचे नातेवाईक सांगतात.

अनिकेत हे अभियंते असून ते रिलायन्स कंपनीत वरिष्ठ अधिकारी आहेत. सोमवारी सकाळी त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने ते त्यांच्या तळोजातील घरुन रुग्णालयाकडे येण्यासाठी निघाले. स्वता मोटार चालवून रुग्णालयापर्यंत जात असताना त्यांना रोडपाली सिग्नलच्या पुढे काही अंतरावर हदयविकाराचा झटका आला. मोटार चालविताना ते हदयविकारात बेशुद्ध झाले. या दरम्यान अनिकेत यांची पत्नी भाग्यश्री या सुद्धा त्यांच्यासोबत होत्या. बेशुद्ध झालेल्या अनिकेतच्या मोटारीने भरधाव वेग घेतला आणि या रस्त्यावरुन पायी चालणा-या २१ वर्षीय ओम तांबे याला धडक दिली. ओम हा व्हॉईट लोटस रुग्णालयाचा कर्मचारी होता.

ओमचा या अपघातामध्ये मृत्यू झाला. त्यानंतर अनिकेतच्या मोटारीने अजून एका उभ्या मोटारीला ठोकले. या अपघातानंतर बेशुद्ध अवस्थेमधील अनिकेत आणि त्यांच्या जखमी पत्नी भाग्यश्री यांना मोटारीमधून काढण्यासाठी पंधरा मिनिटे लागली. जमलेल्या व्यक्तींनी रिक्षामधून बेशुद्ध अनिकेतला रुग्णालयात आणले.

डॉ. डिसिल्वा यांच्या नेतृत्वाखाली काम करणा-या वैद्यकीय पथकाने त्यांची पुढील कामगिरी शिताफीने पार पडली. तातडीने सीटीस्कॅन केल्यावर अनिकेतच्या हदयाच्या डाव्याबाजूच्या नस ही शंभर टक्के बंद झाल्याचे दिसले. तातडीने शस्त्रक्रीया केल्यानंतर २४ तासाने त्यांना शुद्ध आली. या दरम्यान हदयबंद असताना अनिकेत यांच्या मेंदूला सुद्धा शरीरात वाचलेल्या प्राणवायूचा पुरवठा होऊ शकल्याने त्याचे प्राण वाचल्याचे डॉ. डिसिल्वा यांनी लोकसत्ताशी बोलताना सांगीतले. मागील वर्षी नवी मुंबईमध्ये विविध अपघातांमध्ये २८७ जणांचा मृत्यू झाला. शेकडो जखमी झाले. अपघातांची मालिका दररोज नवी मुंबईत आजही सुरूच आहे. वेळीच उपचार न मिळाल्याने प्राण गेलेल्यांची संख्या मोठी आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अनिकेत नलावडे यांचे हदयबंद झाल्यावर काही मिनिटांमध्ये त्यांना रुग्णालयात सर्व यंत्रणा असल्याने सीपीआर वेळीच मिळाला. त्यामुळे ते वाचू शकले. सध्या अनिकेत यांची प्रकृती सूधारत आहे. रुग्णालयाच्या आयसीयूमधील कृष्णा व इतर डॉक्टर आणि आरोग्यसेवकांनी एकत्रित घेतलेल्या प्रयत्नांमुळे हे घडू शकले. छातीत कळ मारु लागल्यास, छातीत अस्वस्थ वाटल्यास किंवा कोणत्याही वैद्यकीय समस्येनंतर वैद्यकीय उपचार प्राधान्याने घ्यावेत. स्वता वाहन चालवून रुग्णालयापर्यंत कोणीही जाऊ नये. कमी वयात हदयविकार येणे ही बदलती जिवनशैलीचा परिणाम आहे. सकस आहार, नियमित व्यायाम, झोप या त्रिसूत्रीचा अवलंब नागरिकांनी करणे गरजेचे आहे. – डॉ. विजय डिसिल्वा, जेष्ठ हृदय तज्ञ