फणसपाडा डोंगरात पाण्याच्या बाटल्या टांगून पक्ष्यांना दिलासा

सीबीडी नोडच्या दक्षिण बाजूस असलेल्या फणसपाडा डोंगराच्या भागात सकाळ-संध्याकाळ शेकडो नवी मुंबईकर फेरफटका मारण्यास जातात. त्यांच्यापैकीच एक असलेल्या भंडारे कुटुंबीयांना रखरखत्या उन्हात पक्ष्यांना पाणी उपलब्ध करून देण्याची संकल्पना सुचली. त्यामुळे आज ५० पेक्षा जास्त झाडांवर पक्ष्यांसाठी पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या आडव्या कापून त्यात पाणी ठेवण्यात आले आहे. सोमवारी या भागात पाण्याचा हौद बांधण्यात आला. त्यामुळे येथील पक्ष्यांना मुबलक प्रमाणात पाणी मिळू शकणार आहे.

कडाक्याच्या उन्हाळ्यात केवळ पिण्यास पाणी नाही म्हणून अनेक चिमुकल्या पक्ष्यांचा जीव जातो. सिमेंटचे जंगल असलेल्या नवी मुंबईत काही कोपरे मात्र हिरवाईचे आहेत. पारसिक डोंगराच्या रांगा असलेल्या सीबीडी नोडच्या दक्षिण बाजूस फणसपाडा नावाचा आदिवासी भाग आहे. तिथे वनराई आहे. सिडकोने या भागात मुक्त संचार करण्यास बंदी घातली आहे. त्यासाठी रस्त्यावर सुरक्षारक्षक तैनात केले आहेत. सकाळ-संध्याकाळ अनेक रहिवासी या भागात फेरफटका मारण्यास जात असतात. गजानन व अर्चना भंडारे हे दाम्पत्यही सकाळी या भागात चालण्यास जाते. गजानन भंडारे यांचा जानेवारी महिन्यात वाढदिवस होता. आपला वाढदिवस एखाद्या सामाजिक कार्याने साजरा करावा अशा हेतूने भंडारे कुटुंबाने येथे साफसफाई करण्याचा निर्णय घेतला.

या ठिकाणी तळीरामांनी केलेला सर्व कचरा त्यांनी हटवला. शेकडो पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या या कचऱ्यात होत्या. टाकाऊतून टिकावू बनवण्याच्या उद्देशाने त्यांनी या बाटल्यांतून पक्ष्यांसाठी छोटेखानी पाणपोया सुरू केल्या. भंडारे कुटुंबाने मागील एक महिन्यापासून या बाटल्या मधोमध किंवा आडव्या कापून त्यात पाणी टाकून त्या झाडाला लटकवण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. आतापर्यंत ५० झाडांना अशा बाटल्या बांधण्यात आल्या आहेत. भंडारे कुटुंबीयांच्या या उपक्रमात त्यांच्या दोन मुलांची क्षितिज व कौस्तुभ यांचीही साथ लाभली आहे. येथे अनेक रंगीबेरंगी पक्षी पाणी पिण्यासाठी येतात, त्यामुळे फेरफटका मारणाऱ्यांनाही पक्षीनिरीक्षणाची संधी मिळते. बाटल्यांमधील पाणी संपले की भंडारे कुटुंब दीड-दोन लिटरचे कॅन घेऊन त्यात ओततात. या उपक्रमाची व्याप्ती वाढवत आता त्यांनी हौद बांधण्याचा उपक्रम सुरू केला आहे. पाणथळीच्या जागी छोटे छोटे हौद बांधण्यात येत आहेत. सोमवारी असा एक हौद सुरक्षारक्षक नाक्यापासून चार किलोमीटर अंतरावर बांधण्यात आला.