मुख्य पिकांच्या जोडीला अंतरपिकामुळे वर्षांकाठी तीन लाखांचे उत्पन्न
उरणच्या नागाव (पिरवाडी) या समुद्र किनाऱ्यावरील शेतकऱ्याने भाजीच्या मुख्य पिकात बदल करून झेंडूसारख्या दिसणाऱ्या जर्मन जातीच्या फुलांची मुख्य पीक म्हणून लागवड केली आहे. त्यामुळे या शेतकऱ्याच्या उत्पन्नात वाढ होऊन २५ हजारांच्या गुंतवणुकीत एक एकरात एक लाख २० हजारांचे उत्पन्न मिळू लागले आहे. तर वर्षांकाठी मुख्य आणि अंतरपिकातून या शेतकऱ्याला तीन लाखांपर्यंतचे उत्पन्न मिळू लागले आहे. त्यामुळे रायगडच्या कृषी विभागाने या वर्षीचा विशेष शेती पुरस्कार देऊन शेतकऱ्याचे कौतुक केले आहे. यापूर्वी चिरनेरमधील एका शेतकऱ्याने उरणमध्ये उसाचे पीक घेऊन प्रयोग केला आहे. उरण तालुक्यातील शेतीखालील क्षेत्र घटू लागले आहे. तर औद्योगिकीकरणाच्या पर्वामुळे तरुणाई शिल्लक असलेल्या शेतीपासून दुरावू लागली आहे. अशा वेळी नागाव (पिरवाडी) समुद्र किनारा येथे मोरेश्वर हशा थळी यांची शेतजमीन आहे. नोकरी करून ही भातशेती ते गेली अनेक वर्षे करीत होते. पावसाळ्यात भातपीक घेतल्यानंतर आठ महिने याच शेतीतून पालक, मुळा,बीट, कांदेमुळा, नवलका व मेथी या भाजीचे उत्पादन घेतले जात होते. त्यामुळे उत्पन्नाला जोड मिळत होती. त्यानंतर काही प्रमाणात गोंडय़ाची फुलेही लावली जात होती. मात्र ही फुले भाजीतील अंतरपीक म्हणून त्याची लागवड केली जात होती. तर ही फुले हंगामी असल्याने तसा त्याचा फायदा होत नव्हता. मात्र गोंडय़ाच्या जागी जर्मन या गोंडय़ासारख्याच दिसणाऱ्या फुलाची लागवड करण्यास थळी यांनी सुरुवात केली. ही फुले आठ महिने येतात. त्यामुळे प्रयोग म्हणून त्यांनी याच फुलांचे मुख्य पीक म्हणून उत्पादन घेण्याचा निर्णय घेतला आणि त्याच्या जोडीला भाजीचे अंतर्गत पीक घेतले. जर्मन जातीच्या फुलाला मागणी वाढत असल्याने त्याच्या क्षेत्रात वाढ केली. याचा फायदा वार्षिक उत्पन्नात वाढ होण्यात झाला. त्यामुळे शेती हाच मुख्य व्यवसाय म्हणून थळी यांनी जर्मनची फूलशेती सुरू केली आहे. त्याचप्रमाणे सुरण लागवडीचाही प्रयोग केला आहे. या त्यांच्या शेतीतील प्रयोगाबद्दल रायगड जिल्ह्य़ाच्या शेती विभागाने २०१५-१६ चा शेतकरी पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला आहे. उरणमधील भाजी मुंबईतील क्रॉफर्ड मार्केटमध्ये विक्रीसाठी जात असल्याने भविष्यात उरणमधील शेतीतून भाजीचे उत्पन्न निघाल्यास उरणच्या फुलांना व भाजीला मुंबईची बाजारपेठ मिळू शकते.